नवी दिल्ली – करोनाची पहिली लाट आली तेव्हा गेल्या वर्षी केंद्र सरकारने 25 मार्च ते 31 मे असा लॉकडाऊन देशभरात लागू केले होता. त्यानंतर 1 जूनपासून अनलॉकची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आली होती.
आता करोनाच्या दुसऱ्या लाटेत केंद्राने लॉकडाऊनचा निर्णय राज्यांवरच सोपवला होता. मात्र, अगदी अखेरचा पर्याय म्हणून लॉकडाऊन करावे असेही सुचविले होते. पण दुसऱ्या लाटेत करोनाचा वेग प्रचंड होता. त्यामुळे आरोग्य सुविधांचे पितळ उघडे पडले. पुरेसे बेड नव्हते अन ऑक्सिजनही नव्हता. राज्ये हतबल झाली. त्यांनी लॉकडाऊनचा निर्णय आपापल्या पातळीवर घेतला. पण गेल्या पंधरवड्यात चित्र सकारात्मक झाले आहे.
रुग्णसंख्या घटू लागली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. नवे बाधितही कमी प्रमाणात सापडत आहेत. मात्र बहुतेक राज्यांत अगोदरच 1 जूनपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे आता राज्ये राज्यातील व्यवहार खुले करणार का, हा प्रश्न आहे. त्याबाबत मध्य प्रदेश वगळता कोणत्याही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ठोस विधान केलेले नाही.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह यांनी 1 जूनपासून व्यवहार सुरू केले जाण्याचे सूतोवाच केले आहे. आम्ही कायमसाठी राज्य बंद ठेवू शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. स्थिती सामान्य होत असल्यामुळे लॉकडाऊनला मुदतवाढ दिली न जाण्याचा थेट उच्चार त्यांनी केला आहे.
दिल्लीतही करोना हाताबाहेर गेला होता. हजारोंच्या संख्येने बाधित सापडत होते. बेड आणि ऑक्सिजनही नव्हता. त्यामुळे मृत्यूदर वाढला आणि जगभर भारताचे ओंगळ चित्र पसरले. पण दिल्लीतील आलेख आता घसरू लागला आहे. मात्र लॉकडाऊन मागे घ्यायचा का, हा निर्णय आता त्या राज्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल घेउ शकत नाही. त्यांना नायब राज्यपालांशी चर्चा करूनच तसे करावे लागणार आहे. त्यानुसार आपण राज्यपालांशी चर्चा करणार असल्याजे केजरीवालांनी शुक्रवारीच स्पष्ट केले आहे.
उत्तर प्रदेशातही परिस्थिती भीषण झाली होती. स्मशानात जागा नव्हती. गंगेत मृतदेह सोडण्यात आले. मात्र आता तेथेही सगळे सावरते आहे. पॉझिटिव्हिटी रेट 3 टक्क्यांपर्यंत खाली आहे. या राज्यात 1 तारखेपर्यंत नाइट कर्फ्यू असेल. नंतर थोडी सूट दिली जाण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही रुग्णसंख्येचा आढावा घेत निर्णय घेतला जाणार असल्याचे म्हटले आहे. नवे बाधित सापडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र, ऑक्सिजनवर असणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झालेली नाही. गेल्या वेळेच्या अनुभवातून आपण काहीतरी शिकतच निर्णय घेतला गेला पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे.
बिहारमध्ये 5 मे पासून लॉकडाऊन आहे. रुग्णसंख्या घटली असली तरी जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत लॉकडाऊनला मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे.
राजस्थानातही 10 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवला जाण्याची शक्यता आहे. याबाबत अद्याप मंत्रिमंडळाची बैठक झालेली नाही. मात्र मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी अगोदरच मुदतवाढीचे संकेत दिलेले आहेत. या राज्यातील आरोग्यतज्ज्ञांनीही लॉकडाऊन कायम ठेवला जाण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले आहे.
तमिळनाडूत 10 मे पासून लॉकडाऊन असून आणखी आठवडाभर त्याची मुदत वाढवली जाणार आहे. या राज्यात अगोदर ज्या गोष्टींना परवानगी दिली गेली होती, त्यांना मुदतवाढीतही सूट दिली जाणार आहे. मात्र अन्य बाबींवर कडक निर्बंध कायम ठेवले जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, केरळ आणि कर्नाटक या दोन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी अगोदरच लॉकडाऊनची मुदत आठवडाभरासाठी वाढवली आहे.