मुंबई – आपल्याकडे मातृत्वाच्या भावनेने पहणारा निसर्ग कोपला की काय होते हे करोना विषाणूने दाखवून दिले आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनानिमित्ताने वन विभागाच्या वेबिनारमध्ये ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी विकास कामे सुरू ठेवतानाच निसर्गाचं संवर्धन करण्यासाठी तांत्रिक आणि शास्त्रीय सल्ला देणारी संस्था स्थापन करा, या संस्थेचा सल्ला बंधनकारक असला पाहिजे, अशी अशी सूचना केली.
आपण विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱ्हास करत आहोत. त्यामुळेच जंगलाचा ऱ्हास करून विकास कामांचे प्रस्ताव जेंव्हा आपल्यासमोर येतात तेंव्हा त्याला आपला विरोध असतो. याचा अर्थ आपला विकासाला विरोध आहे असा नाही तर निसर्गस्नेही विकासाची संकल्पना आपल्याला मान्य आहे, असे ते म्हणाले.
गेल्यावर्षी निसर्ग चक्रीवादळ आले, यावर्षी तौक्ते चक्रीवादळ आले. चक्रीवादळ आले की आपण हवामान बदलाचे कारण सांगतो. पण हवामान बदल होण्यास कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत याचा आपण गांभीर्याने विचार करणार आहोत का, असा सवालही त्यांनी व्यक्त केला.
जैवविविधतेसाठी लोकसहभागाची गरज
जैवविविधतेत नष्ट होणाऱ्या प्राण्यांची आणि वनस्पतींची नोंद घेणे एवढेच काम या क्षेत्रात होऊ नये तर मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी. लोकसहभाग वाढवून त्याच्या रक्षणाचे काम व्हाव,े असे मुख्यमंत्री म्हणाले. आजच्या युवा पिढीमध्ये निसर्ग, जैवविविधता याविषयी प्रचंड रस आह.े ते याक्षेत्रात अभ्यास करून, संशोधन करून पुढे जाऊ इच्छितात. अशा सर्व युवकांना सहकार्य आणि पाठिंबा देण्याची गरज आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
निसर्ग अजूनही आपल्याकडे मातृत्वाच्या भावनेने पहातो आणि आपल्याला जपतो आहे. पण लक्ष्मण रेषा ओलांडली की काय होते हे कोरोना विषाणुने दाखवून दिले आहे असे मुख्यमंत्री म्हणाले. सुयोग्य वर्तन हवे. निसर्गासोबत जगण्यासाठी सुयोग्य वर्तन विकसित करायला हवे. असे झाले तरच आरोग्यदायी विकास होईल असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.