अमरावती – खासगी रूग्णालयांना होणारा करोनावरील लसींचा पुरवठा रोखला जावा, अशी मागणी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस.जगनमोहन रेड्डी यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. त्याविषयीचे पत्र जगन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले आहे.
संबंधित मागणीसाठी जगन यांनी लस टंचाई आणि खासगी रूग्णालयांकडून आकारले जाणारे भरमसाठ शुल्क या मुद्द्यांवर भर दिला आहे. खासगी रूग्णालये लसीच्या एका डोससाठी 2 ते 25 हजार रूपये वसूल करत आहेत. त्यामुळे भारतातील डोस जगातील सर्वांत महागडे ठरत आहेत.
त्यातून सामान्य जनतेकडून टिकाटिप्पणी होत आहे. जनतेच्या भल्यासाठी असणारी लस मोफत किंवा किमान परवडणाऱ्या दरात उपलब्ध होण्याची गरज आहे, असे जगन यांनी पत्रात म्हटले आहे. पुरेशा लसींअभावी 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरणही पूर्ण करणे अवघड बनले आहे.
पुढील काही महिने 18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांचे मोफत लसीकरण सुरू करणेही शक्य दिसत नाही. अशा स्थितीत खासगी रूग्णालयांना भरमसाठ दरात लसीकरण करण्याची परवानगी देणे समर्थनीय नाही. लसींचा चढा दर गरिबांना परवडणार नाही. त्याशिवाय, लसींच्या काळ्या बाजारालाही चालना मिळेल, याकडेही जगन यांनी लक्ष वेधले आहे.