नवी दिल्ली – नियंत्रण रेषेवर संयुक्त राष्ट्राच्या वाहनावर भारतीय जवानांनी मुद्दाम गोळीबार केल्याचा पाकिस्तानने केलेला आरोप भारताने आज फेटाळून लावला. संयुक्त राष्ट्राच्या पदाधिकाऱ्यांच्या संरक्षणात अपयश आल्यामुळे पाकिस्तानकडून हा खोटा आरोप केला जात असल्याचे भारताने म्हटले आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील संयुक्त राष्ट्रांच्या सैन्य निरीक्षक समूहाचे दोन अधिकारी असलेल्या वाहनावर भारतीय जवानांकडून मुद्दाम गोळीबार केला गेला असल्याचा आरोप पाकिस्तानच्या सैन्याच्य प्रसार माध्यम विभागाकडून आणि परराष्ट्र मंत्रालयाच्यावतीने करण्यात आला होता. मात्र भारताने कालच हा दावा पूर्णपणे फेटाळून लावण्यात आला होता.
गोळीबाराच्या खुणा असालेल्या संयुक्त राष्ट्राच्या वाहनाचे फोटो पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल बाबर इफ्तिखार यांनी ट्विट केले होते. या “एसओव्ही’वर “एलओसी’च्या चिरिकोट सेक्टरमध्ये चिथावणीखोरपणे गोळीबार केला गेला असल्याचा दावाही त्यांनी केला होता.
मात्र “18 डिसेंबर 2020 रोजी भारतीय सैन्याने जाणीवपूर्वक “यूएन’च्या वाहनाला लक्ष्य केले, या पाकिस्तानने केलेल्या आरोपांची सखोल चौकशी करण्यात आली असून ती माहिती प्रत्यक्षात चुकीची व खोटी असल्याचे दिसून आले आहे.’ असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी सांगितले.
भारतीय लष्कराला सीमेजवळ संयुक्त राष्ट्राच्या लष्करी निरीक्षकांच्या भेटीची कल्पना होती आणि आरोप झाल्यानुसार गोळीबार केला नाही. पाकिस्तानच्या नियंत्रणाखाली असलेल्या भूभागावर संयुक्त राष्ट्राच्या पदाधिकाऱ्यांच्या सुरक्षा जपण्यात आलेले अपयश लपवून ठेवण्यासाठी भारताविरूद्ध निराधार आणि बनावट आरोप केले जात आहेत. या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी शोधण्याचे काम पाकिस्तानने करायला पाहिजे, असेही श्रीवास्तव यांनी सांगितले.