इस्लामाबाद – सध्याच्या वातावरणात आम्ही भारताशी व्यापारी संबंध ठेऊ इच्छित नाही अशी भूमिका पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी घेतली आहे. आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांबरोबर चर्चा केल्यानंतर त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली. त्यांच्या व्यापार मंत्रालयाने भारतातून कापूस आणि साखर आयातीला अनुमती द्यावी अशी शिफारस मंत्रिमंडळाकडे केली होती. त्या प्रस्तावावर सविस्तर चर्चा झाल्यानंतर हा प्रस्ताव फेटाळण्यात आला.
पाकिस्तानला लागणाऱ्या गरजेच्या वस्तु भारता व्यतिरीक्त अन्य कोणत्या देशांतून उपलब्ध होऊ शकतील याचा पर्याय शोधण्यास सांगण्यात आले आहे. पाकिस्तानच्या आर्थिक समन्वय समितीने भारतातून कापूस, साखर आणि सूत आयातीला अनुमती देण्यात यावी अशी शिफारस केंद्रीय मंत्रिमंडळाला केली होती.
केवळ आर्थिक सोयीसाठी ही शिफारस करण्यात आली होती असे या समितीने म्हटले आहे. पण पंतप्रधानांनी या समितीचा निर्णय अमान्य केला आणि भारताशी सध्याच्या स्थितीत व्यापारी संबंध ठेवता येणार नाहीत ही भूमिका स्पष्ट केली.
व्यापाराच्या या निर्णयाचा पकिस्तान सरकारने काश्मीरातील कलम 370 रद्द करण्याच्या भारताच्या निर्णयाशी संबंध जोडला आहे. हे कलम रद्द करण्याचा निर्णय भारत सरकार जो पर्यंत मागे घेत नाही तो पर्यंत भारताबरोबर कोणतेही व्यापारी संबंध ठेवता येणार नाहीत असे पाक सरकारच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.