अहमदाबाद – तुम्ही गुजरात मधील निवडणूका लढवू नका आम्ही तुमचे मंत्री मनिष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांना सोडून देऊ अशी ऑफर भाजपने आपल्याला दिली असल्याचा खळबळजनक दावा आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.
एका दूरचित्रवाणी वाहिनीशी झालेल्या संवाद कार्यक्रमात बोलताना त्यांनी हा दावा केला. मनिष सिसोदिया यांनाही आप सोडून भाजपबरोबर या तुम्हाला मुख्यमंत्री करू अशी ऑफरही भाजपकडून देण्यात आली होती असेही केजरीवाल यांनी यावेळी सांगितले.
राज्यात मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता, उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण https://t.co/HVQn8haqoA
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) November 5, 2022
तेलंगणातही तेथील सरकार पाडण्यासाठी जे मध्यस्थ तिकडे गेले होते व जे मोठ्या रोकडसह पोलिसांच्या जाळ्यात सापडले त्यांचे स्टींग ऑपरेशन तेथील सरकारने केले असून त्याचे रेकॉडिंग गुरूवारी तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सादर केले आहे. त्या पाठोपाठ केजरीवालांनी हा जाहीर दावा केल्याने भाजपने चालवलेले कारस्थान उघड झाल्याचे सांगितले जात आहे.
भारतीय जनता पक्षाने कितीही प्रयत्न केला तरी आम्ही गुजरात मध्ये निर्धाराने लढणार आहोत आणि तेथील लोकांनीही पुढील महिन्यात या सरकारला सत्तेवरून घालवण्याचा मनोदय व्यक्त केला आहे अशी माहितीही त्यांनी दिली. गुजरात मध्ये नुकत्याच झालेल्या पुल दुर्घटनेवरूनही त्यांनी भाजपवर निशाणा साधला.
ते म्हणाले की घड्याळे तयार करणाऱ्या कंपनीला विना टेंडर पुलाच्या दुरूस्तीचे काम देण्यात आले. या प्रकरणात जो गुन्हा दाखल करण्यात आला, त्यात कंपनी प्रमुखाचे नावच नाही. तो आता फरारी आहे. भाजपच्या भ्रष्टाचाराचे हे सज्जड प्रकरण आहे असेही त्यांनी म्हटले आहे.