आळंदी – पुणे-आळंदी रस्त्यावर देहूफाटा ते काटेवस्ती या केवळ पाचशे मीटर अंतराच्या रस्त्यावर भामा आसखेडची पाइपलाइन व इतर केबल टाकण्यासाठी सहा महिन्यापूर्वी संपूर्ण रस्ता खोदण्यात आला होता. पाइपलाइनचे काम पूर्ण झाल्यानंतर ठेकेदाराने पावसाळ्याचे कारण पुढे करीत त्या ठिकाणी तात्पुरती डागडुजी केली. काही आठवड्यातच रस्त्याची चाळवण झाली. तेव्हापासून आज तागायत रस्त्यावर ठिकाणी खड्डे पडले आहेत.
याकडे संबंधित विभाग तसेच आळंदी नगरपरिषद बांधकाम विभाग हे ठेकेदाराला रस्ता का करीत नाहीत, असा जाब विचारण्यास धजत नाहीत. त्यामुळे नागरिकांना व वाहनचालकांना या ठिकाणी अनेक समस्यांशी सामना करावा लागत आहे. छोटे-मोठे अपघात घडत आहेत. रस्त्यावरील खडी अंगावर उडून मोठा अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
त्यामुळे जनतेच्या पैशाचा अपव्यय होतो आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच धुळीचा त्रासदेखील सहन करावा लागत आहे. यामुळे अनेक नागरिक वाहनचालक यांना तारेवरची कसरत करून अवघ्या पाचशे मीटर रस्त्यावर प्रवास करताना अर्धा तासाचा अवधी विनाकारण खर्ची करावा लागत आहे. नागरिकांचे व वाहनचालकांचे कंबरडे मोडत असून अनेक वाहनांचे अतोनात नुकसान होत आहे. याकडे स्थानिक नगरसेवकांकडे तक्रार केली असता तेही जाणीपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत.
येत्या आठ दिवसांत हा रस्ता देहुफाटा चौक ते काटे वस्ती यादरम्यान लवकरात लवकर दुरुस्ती करून पक्क्या स्वरूपाचा करावा, अन्यथा आळंदी शहर मनसेच्या वतीने मनसे स्टाइलने रस्ता रोको आंदोलन केले जाईल. यात ठेकेदाराची सर्वस्वी जबाबदारी असेल, असा इशारा आळंदी शहर मनसेचे अध्यक्ष अजय तापकीर यांनी संबंधितांना दिला आहे.