येरवडा – भामा आसखेड पाणीपुरवठा योजना सुरु होवुनही येरवड्यातील जयप्रकाश नगर आणि गांधीनगर येथील नागरिकाना मागील तीन महिन्यापासुन दुषित आणि अपुरा पाणीपुरवाठा केला जात असुन बंडगार्डन पाणीपुरवठा विभागाकडे याची वारंवार तक्रार करुनही प्रश्न सोडविला जात नसल्याने येथील नागरिकांनी महापालिकाभवनवर हंडा मोर्चा काढला.
जयप्रकाश नगर येथील 25 ते 30 घरांना तीन महिन्यापासुन पाणीपुरवठा होत नाही. ज्या भागात पाणी येथे तेथेही अपुरे आणि दुर्घंधीयुक्त पाणी येते, येथील जलवाहिन्या जुन्या झालेल्या आहेत. ड्रेनेजचे पाणी पिण्याच्या पाण्यामध्ये मिसळत असल्याने पाण्याचा घाण वास येतो, यामुळे परीसरातील नागरिक आजारी पडले असुन आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
जलवाहिन्या तातडीने बदलाव्या याची वारंवार मागणी केली आहे. मात्र निधी उपलब्ध नाही. कोविडमुळे निधी मिळत नसल्याचे कारण दिले जाते. पहाटे 5ते आठ वाजेपर्यंत पाणी सोडण्याची वेळ आहे मात्र फक्त अर्धा तासच पाणी सोडले जात असल्याने पुरेसे पाणीही उपलब्ध होत नाही. याची दखल क्षेत्रीय कार्यालयही घेत नाही आणि पाणीपुरवठा विभागाचे अधिकारीही उडवाउडवीची उत्तरे देतात. त्यामुळे महापालिका भवनसमोर महिलांचा हंडा मोर्चा काढण्यात आला आहे. 10 दिवसात जर प्रश्न सोडविला नाहीतर उग्र आंदोलन करण्यात येईल असे येरवडा कॉंग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष रमेश सकट यांनी सांगितले.
यावेळी लीला सोनवणे, नसीम पटेल, भावना गवस, वैशाली शिरसाठ, राणी थोरात, शोभा कोकरे, अंजना कांबळे, हिना शेख, चैत्राली गोरे, अनिता सोनवणे, संगिता चौधरी बबिता केवटे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.