नवी दिल्ली – इस्लामाबाद येथे पाकिस्तानविरुद्ध होणारी डेव्हिस चषक टेनिस लढत सुरक्षेच्या दृष्टीने अन्य ठिकाणी आयोजित करावी, अशी मागणी भारतीय खेळाडूंनी अखिल भारतीय टेनिस संघटनेकडे (एआयटीए) केली आहे.
भारतीय संघाचे न खेळणारे कर्णधार महेश भूपती यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, आम्ही ही लढत पाकिस्तानात घेऊ नये अशी अनेक वेळा मागणी करूनही एआयटीएचे सरचिटणीस हिरोन्मय चटर्जी यांनी त्याकडे अद्याप दुर्लक्ष केले आहे. तेथील सुरक्षा व्यवस्थेचा पुन्हा आढावा घेण्याबाबत चटर्जी यांनी आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाला विनंती केली आहे. खरंतर एव्हाना एआयटीएने सामन्यांचे हे ठिकाण यापूर्वीच बदलून घेतले असते. त्यांच्या संथ कारभाराबाबत संघातील सर्वच खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली आहे.
भारत व पाकिस्तान यांच्यात होणारे हे सामने दोन देशांमधील मालिका नसून आशिया-ओशेनिया गटातील सामने असल्यामुळे केंद्रसरकार त्यामध्ये हस्तक्षेप करू शकणार नाही. हा निर्णय सर्वस्वी संबंधित टेनिस संघटनांनी घ्यावयाचा आहे असे केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजु यांनी नुकतेच जाहीर केले होते.