नवी दिल्ली –करोना संकटाने पुन्हा डोके वर काढल्याने दिल्ली आणि लगतच्या शहरांमधील स्थलांतरित कामगार चिंतातूर बनले आहेत. पुन्हा लॉकडाऊन होतो की काय या विचाराने ते धास्तावले आहेत. अर्थात, त्यांना करोनाची धास्ती नाही; तर जगणं अवघड होण्याची भीती वाटत आहे.
दिल्लीत वीकेंड कर्फ्यू लागू झाला आहे. त्यामुळे देशाच्या राजधानीत शुक्रवारी रात्रीपासून 55 तासांसाठी संचारबंदी असेल. त्या पाऊलानंतर लॉकडाऊनच्या फेऱ्यात पुन्हा अडकण्याच्या शक्यतेने स्थलांतरित कामगारांना ग्रासले आहे. त्यातून काहींनी दिलेल्या प्रतिक्रिया अतिशय बोलक्या ठरत आहेत. आमच्या कुटूंबीयांना करोनाबाधा होण्याची बिल्कूल चिंता वाटत नाही.
आम्हाला अधिक धास्ती आहे ती लॉकडाऊनची. पुन्हा लॉकडाऊन झाल्यास आमची आर्थिक स्थिती आणखीच हलाखीची बनेल. करोनाच्या दोन लाटांचा आम्हाला मोठा आर्थिक तडाखा बसला. त्यातून कसेबसे सावरत असतानाच करोनास्थिती पुन्हा बिघडू लागली आहे. आता आणखी आर्थिक फटका आम्ही सहन करू शकणार नाही, अशा भावना काही स्थलांतरित कामगारांनी व्यक्त केल्या.
याआधीच्या लॉकडाऊनमध्ये आपले राज्य, मूळ गाव सोडून उपजीविकेसाठी इतरत्र गेलेल्या स्थलांतरित कामगारांचे मोठे हाल झाले. आपापल्या घरांकडे परतण्यासाठी त्यांनी केलेली केविलवाणी धडपडही संपूर्ण देशाने पाहिली. आता ते नकोसे अनुभव पुन्हा येऊ नयेत अशीच प्रार्थना जणू स्थलांतरित कामगार करत आहेत. लॉकडाऊनचे तोटे ठाऊक असल्याने केंद्र आणि राज्य सरकारेही सावध पाऊले उचलत आहेत. लॉकडाऊन टाळून निर्बंध कडक करण्याची भूमिकाच त्यांनी तूर्त घेतलेली दिसते.