नवी दिल्ली – देशात काही दिवसांपासून करोना संसर्गाचा वेग वाढला असून करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाटयाने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. भारतातील संभाव्य तिसरी लाटेचा उच्चांक जानेवारीच्या शेवटी आणि फेब्रुवारीच्या सुरूवातीपर्यत जाणवेल. या काळात देशामध्ये दैनंदिन रुग्णसंख्या 4 ते 8 लाखांपर्यत पोहोचू शकते. यानंतर मार्चअखेर तिचा प्रभाव संपुष्टात येईल, असे भाकित आयआयटी कानपूरचे प्राध्यापक मनिंद्र अग्रवाल यांनी केले आहे.
प्रा. मनिंद्र अग्रवाल यांनी सांगितले की, नवी दिल्ली आणि मुंबईमध्ये पुढील दहा दिवसांमध्ये म्हणजे जानेवारीच्या मध्यापर्यंत करोना संक्रमणाचा वेग उच्चांकी पातळीवर राहू शकतो. या दोन्ही शहरांमध्ये सर्वाधिक 30 ते 50 हजारांपर्यत रुग्णांची नोंद होवू शकते.
या महिन्याच्या अखेरीस संपूर्ण देशात करोना रुग्णांच्या संख्येचा उच्चांक दिसेल. या काळात देशात दररोज 4 ते 8 लाख प्रकरणे दिसण्याची शक्यता आहे. परंतु त्याचा आरोग्य यंत्रणेवर भार पडणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
या काळात कठोर निर्बंध लागू केल्यास मार्चपर्यंत प्रकरणांमध्ये घट होण्याची शक्यता आहे. मार्चच्या अखेरीस दररोज 10 ते 20 हजार प्रकरणांची अपेक्षा करू शकतो. ओमिक्रॉन ज्या वेगाने पसरत आहे ती पाहता संपूर्ण देशात मार्चमध्ये त्याचा प्रभाव ओसरलेला दिसेल, अशी माहिती त्यांनी दिली.