अहमदाबाद – गेल्या पंधरा महिन्यापेक्षा जास्त कालावधीमध्ये देशातील सर्वच राज्यांमधील सर्वच गावांना करोना महामारीचा तडाखा बसला असताना नर्मदा सरोवर प्रकल्पाच्या बॅकवॉटर परिसरातील पाच गावांमध्ये अद्यापही करोनाचा शिरकाव झाला नसून ही सर्व गावे करोनामुक्त आहेत.
महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि गुजरात या तीन राज्यांच्या सीमेवर वसलेल्या या गावांमध्ये गेल्या पंधरा महिन्यांच्या कालावधीमध्ये करोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. देशाच्या इतर भागातील रुग्णांची संख्या दोन कोटीच्या आसपास पोहोचली असताना आणि मृतांचा आकडाही तीन लाखांच्यावर गेला असताना ही पाच गावे मात्र मोकळा श्वास घेत आहेत.
या गावांमध्ये डॉक्टर, नर्स किंवा हॉस्पिटल अशी कोणतीही सुविधा नसूनही गावातील नागरिक संपूर्णपणे निरोगी आहेत. मध्यप्रदेशातील अलीराजपुर जिल्ह्यातील चिलकदा, खोडआंबा आणि जलसिंधी ही गावे आणि महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील रोषमालख आणि चितखेडी ही गावे सरदार सरोवर प्रकल्पाच्या बॅक वॉटर क्षेत्रांमध्ये आहेत.
या गावांमध्ये एकूण 415 घरे असून दोन हजार पेक्षा जास्त लोकसंख्या आहे. पण या लोकसंख्येपैकी कोणालाही करोनाची बाधा झाली नसून कोणाचेही लसीकरण अद्याप करण्यात आलेली नाही अर्थात केवळ ही महामारी नव्हे तर या गावांमध्ये गेल्या दोन ते तीन वर्षांच्या कालावधीमध्ये कोणीही आजारी पडलेले नाही वा कोणाचा मृत्यूही झालेला नाही.
या गावामध्ये करोना न पसरण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्या सर्व गावांमधील घरे एकमेकांपासून खूप दूर अंतरावर आहेत. या गावात बाहेरून कोणीही न आल्यामुळे बाहेरून विषाणूंचा प्रवेश या गावांमध्ये झालेला नाही या गावातील लोकांना दररोज दुर्गम भागातील डोंगरातून चढ-उतार करावी लागत असल्यामुळे त्यांची प्रतिकार क्षमता ही भक्कम आहे. प्रतिकारक्षमता चांगली असेल आणि सोशल डिस्टंसिंगसह सर्व नियमांचे पालन केले जात असेल तर करोना आसपास फिरकणार नाही असा संदेश या पाच गावांनी देशातील सर्व गावांना दिला आहे.