पाटणा – बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीवरून भाजप आणि जेडीयू या सत्ताधारी मित्रपक्षांमध्येच जुंपली आहे. त्यामुळे त्यांच्यातील तणाव वाढत चालल्याचे चित्र पुढे आले आहे. जेडीूयच्या खासदारांनी काही दिवसांपूर्वी लोकसभेत विशेष राज्याच्या दर्जाचा मुद्दा उपस्थित केला. संबंधित मागणीचा विचार मोदी सरकार करणार की नाही, हे जाणून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मात्र, जेडीयूच्या भूमिकेवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष संजय जयस्वाल यांनी निशाणा साधला. बिहारला महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालपेक्षाही अधिक केंद्रीय मदत मिळत असल्याचा दावा त्यांनी केला.
त्याशिवाय, बिहार सरकारच्या काही धोरणांबाबतही त्यांनी नापसंती व्यक्त केली. जयस्वाल यांची भूमिका न रूचल्याने जेडीयूने पलटवार केला. त्यासाठी त्या पक्षाने भाजपचे नेते असणारे बिहारचे उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद यांनी केंद्र सरकारकडे सादर केलेल्या दस्तावेजाचा आधार घेतला. केंद्रीय करांमधील बिहारचा वाटा कमी होत चालल्याचे त्या दस्तावेजात नमूद करण्यात आले आहे. बिहारवर अनेक प्रकारचे अन्याय झाले आहेत. त्यामुळे विशेष राज्याचा दर्जा मिळणे हा बिहारचा हक्कच आहे, असेही जेडीयूने म्हटले.