नवी दिल्ली – दिल्ली जवळ गेले चार दिवस ठिय्या देऊन आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांशी केंद्र सरकारने त्वरीत बिनशर्त चर्चा करावी अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. आम आदमी पक्षाचा या आंदोलनाला पुर्ण पाठिंबा आहे असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
आम आदमी पक्षाच्या प्रवक्त्याने आज पत्रकार परिषदेत असा आरोप केला की दिल्ली जवळ हजारो शेतकरी ऐन थंडीत रस्त्यावर जमून आंदोलन करीत असताना त्यांच्याकडे लक्ष देण्याऐवजी गृहमंत्री अमित शहा यांनी हैदराबाद महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला जाणे हे बेजबाबदारपणाचे लक्षण आहे.
शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे करोना वाढत असल्याचा दावा एकीकडे अमित शहा हे करतात पण त्याचवेळी ते हैदराबाद येथील भाजपच्या प्रचारासाठी रोड शो करतात हा विरोधाभास आहे असेही आपचे प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांनी म्हटले आहे.
अमित शहाच्या रोड शो वेळी कोणतेही सोशल डिस्टसिंग पाळले गेले नव्हते असा आरोपही त्यांनी केला. अमित शहांसारखा गृहमंत्री देशाला लाभणे हे देशासाठी धोकादायक आहे असेही त्यांनी म्हटले आहे.