पुणे – बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या वाऱ्याचे प्रमाण कमी झाले असले तरीही दक्षिण अंदमान समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे राज्यातील थंडी गायब झाली असून, पुण्यासह संपूर्ण राज्यात किमान तापमानात वाढ झाल्याची नोंद हवामान विभागाने घेतली.
उत्तरेतून महाराष्ट्राच्या दिशेने वाहणाऱ्या थंड वाऱ्याच्या प्रभावामुळे राज्यात थंडी पडते. मात्र, बंगालच्या उपसागरात गेल्या आठवड्यापासून वारंवार कमी दाबाचे पट्टे, तसेच वादळे तयार होत आहेत. त्याच्या प्रभावामुळे उत्तरेतून येणाऱ्या थंड वाऱ्यांना अडथळा निर्माण झाला आहे.
त्यामुळे राज्यात थंडीला ब्रेक लागला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात 2 डिसेंबरपर्यंत ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात वाढ राहणार आहे. तर वातावरणात बदल होऊन थंडीदेखील जाणवण्याची शक्यता आहे.
दरम्यान, शहरातील शिवाजीनगर वेधशाळेमध्ये किमान तापमानाचा पारा 20.5 अंश सेल्सिअस नोंदला गेला. सरासरीपेक्षा 7.8 अंश सेल्सिअसने किमान तापमानाचा पारा वाढला आहे.
मात्र, येत्या सोमवारपासून (दि. 30) पुन्हा किमान तापमानाचा पारा कमी होईल. त्यामुळे हवेत गारठा वाढेल. येत्या शनिवारपर्यंत (दि. 5) किमान तापमान 15 अंश सेल्सिअसपर्यंत कमी होईल, असा अंदाजही हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे.