आळंदी (ज्ञानेश्वर फड) – ज्ञानोबा माऊऽऽली… तुकाराम… हा हरिनामाचा जयघोष ऐकण्यासाठी आसुसलेल्या अलंकापुरीला हा चैतन्याचा अविष्कार दोन वर्षांच्या खंडानंतर पुन्हा अनुभवता येणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 725 व्या संजीवन समाधी सोहळ्याला जिल्हा प्रशासनाने परवानगी दिल्यानंतर त्याचे नियोजन जिल्हाधिकाऱ्यांसह झालेल्या बैठकीत गुरूवारी करण्यात आले.
माऊली नामघोषाने दरवर्षी संजीवन समाधी सोहळा आणि कार्तिकी एकादशीला गजबजणारी आळंदी गेली दोन वर्ष सुनीसुनी झाली होती. करोनाच्या साथीमुळे प्रशासनाने घातलेल्या निर्बंधांना वारकऱ्यांनी मनापासून साथ दिली होती. मनातील हुरहूर ओठावर न येऊ देता मनातच त्यांनी माऊलींचे नामस्मरण सुरू ठेवले होते. मात्र, करोनाची साथ नियंत्रणात आल्याने आणि राज्यात पुरेशा प्रमाणात लसीकरण झाल्याने यंदा समाधी सोहळ्यास परवानगी देण्यात आली आहे.
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन सोहळ्यानिमित्त 27 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर या कालावधीत यंदाची कार्तिकी वारी मोठ्या उत्साहात होणार आहे. हे वर्ष माऊलींच्या संजीवन समाधीचे सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी (725)वे वर्ष आहे. त्यामुळे वारकऱ्यांच्या भक्तीभावाला उधाण आले आहे. आळंदीच्या या यात्रेला राहती यात्रा म्हणतात. अष्टमीपासून येणारे नेमाचे वारकरी अमावस्येपर्यंत राहतात. त्यामुळे यात्राकाळात वारकऱ्यांना सर्व सुविधा मिळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागांना आदेश दिले आहेत.
आळंदीसह पंचक्रोषित स्वच्छता, जंतूनाशक फवारणी, सार्वजनिक आरोग्य, स्वच्छ पाणी पुरपठा, गॅस आणि रॉकेलचा पुरवठा, गर्दी व्यवस्थापन, वाहतूक नियोजन, फिरते स्वच्छतागृहाची योग्य व्यवस्था करावी, कोणत्याही समस्या उद्भवणार नाहीत याची काळजी घ्यावी, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी यावेळी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्यासह, निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, खेडचे प्रांत विक्रांत चव्हाण, आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी अंकूश जाधव, आळंदीचे निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त डॉ. अभय टिळक, विश्वस्त ऍड विकास ढगे पाटील, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, आळंदीकर ग्रामस्थ डी. डी. भोसले पाटील, चैतन्य बुवा कबीर, संजय घुंडरे पाटील, हभप मारूती कोकाटे उपस्थित होते.
27 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर दरम्यान रंगणार सोहळा
27 तारखेला श्रीगुरू हैबतबाबा यांच्या पायरी पुजनाने माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यास सुरुवात होणार आहे. 30 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी (उत्पत्ती एकादशी) आळंदी यात्रा आहे. एकादशीनिमित्त माऊलींची नगरप्रदक्षिणा होईल. द्वादशीला 1 तारखेला माऊलींचा रथोत्सव होईल. तर 2 डिसेंबरला संत नामदेवराय यांच्या वंशजांच्या वतीने समाधी सोहळ्याचे कीर्तन होईल. पुष्पवृष्टी होऊन माऊलींचा समाधी सोहळा साजरा होईल. 4 डिसेंबरला अमावस्येला सायंकाळी माऊलींचा छबीना निघेल आणि सोहळ्याची सांगता होईल.
देवस्थानच्या मागण्या
– इंद्रायणीच्या पलीकडील दर्शन मंडप जागेचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघावा
– यात्राकाळात विकेंद्रीत स्वरूपात गॅस वितरणाची सोय करावी
– सिलिंडर डिपॉझिटसाठी 2000 ऐवजी 500 रुपये घ्यावेत
– शहरासह परिसरात स्वच्छता आणि वारकऱ्यांना सर्व सुविधा द्याव्यात.
“करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी तो पूर्ण संपलेला नाही. संस्थानच्या फेसबुक पेजवर ऑनलाईन दर्शनाची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे जे ज्येष्ठ वारकरी आहेत त्यांनी त्या सुविधेचा लाभ घ्यावा. ज्याचे करोना लसीकरणाचे दोन डोस पूर्ण झालेले आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणात यात्रेत सहभागी व्हावे. माऊलींचा 725 वा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.”
– डॉ. अभय टिळक (विश्वस्त, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी)