आळंदी – श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा अवघ्या चार दिवसांवर आला आहे. वारकरी, भाविक आता आळंदीत येण्यास सुरूवात झाली आहे. रविवारी (दि.11) पालखी प्रस्थान सोहळा असून सोमवारी (दि. 12) सकाळी पालखी पुणे मुक्कामाकडे रवाना होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर प्रस्थान सोहळ्यासाठी आलेल्या लाखो भाविकांना सेवा, सुविधा पुरविण्यासाठी नगरपरिषद प्रशासन सज्ज झाले आहे. सोहळ्यादरम्यान, वारकऱ्यांना 24 तास पाणीपुरवठा केला जाणार आहे. पालिकेने शहरात विकेंद्रित पद्धतीने 5 टॅंकर फिलिंग ठिकाणांची व्यवस्था केली आहे. एकूण 22 टँकर्स पाणी पुरवठ्यासाठी तैनात असणार आहेत. जलशुद्धीकण केंद्राची स्वच्छता, मोटारींची दुरुस्ती, टीसीयल पावडर व इतर साहित्य खरेदी इत्यादी तयारी पूर्ण झाली असून शौचालयांना मुबलक पाणीपुरवठा होण्यासाठी अनेक ठिकाणी स्वतंत्र पाईप लाईन टाकून काम पालिकेने केले आहे.
तसेच शहरातील मंदिर व इंद्रायणी घाट परिसरात तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी एकूण 17 हायमास्ट बसवण्यात आले आहेत. शहरातील मोबाईल टॉयलेटना विद्युत व्यवस्था करण्यात आली आहे. रस्त्यावरील दिवाबत्तीची दुरुस्तीचीही कामे पूर्ण झाली आहेत. पाणी पुरवठा केंद्र याठिकाणी 250 के. व्ही.ए क्षमतेचे जनरेटरची व्यवस्थाही पालिके मार्फत करण्यात आली आहे.
पालिकेच्या CCTV ची असेल‘करडी‘ नजर –
पालिके मार्फत आळंदी शहरात सर्व महत्वाच्या ठिकाणी एकूण 130 CCTV कॅमेरे आणि 3 मोठ्या स्क्रीन देखील बसविण्यात आले असून पोलिस यंत्रणेस चोरीच्या घटना रोखण्यात व इतर तपासात याची मोठी मदत होणार आहे.
स्वच्छतेसाठी कर्मचारी 24 तास तैनात –
आषाढी वारी कालावधीत गर्दीच्या अनुषंगाने शहरात निर्माण होणा-या घनकचरा, रस्ते साफसफाई, औषध फवारणी, धुर फवारणी आदी कामे 24 तास केली जाणार आहेत. नगरपरिषदेच्या 12 घंटागाड्या, 3 कॉम्पाक्टर, 5 टॅक्टर, सक्शन मशीन आदी वाहनांसह 100 सफाई कर्मचारी 24 तास तैनात असणार आहेत. शहरातील नगरपरिषद मालकीचे सर्व सार्वजनिक शौचालय एकूण 356 सिट्स, सुलभ शौचालयाच्या एकूण 490 सिट्स सह, 1500 मोबाईल टॉयलेट्स भाविकांना वापरण्यास उपलब्ध करुन देण्यात आले आहे. शहरात संसर्गजन्य रोग पसरू नये या करीता शहरात नियमितपणे जंतू नाशक फवारनी व धुर फवारणी केली जात आहे.
“आवश्यक त्या सर्व ठिकाणच्या रस्त्यांची दुरुस्तीचे काम पालिकेने पूर्ण केली असून वारकऱ्यांच्या सोयीसाठी प्रदक्षणा मार्ग, मंदिर परिसर व सर्व महत्वाच्या रस्त्यांवरील अतिक्रमण काढून घेतली आहेत. आवश्यक ठिकाणी 12 वाॅच टाॅवर, 6 वैद्यकीय पथक कक्ष, पोलीस बंदोबस्तासाठी 6 मंडपकक्ष, अनाउंसमेंटसाठी 59 भोगे, इंद्रायणी घाटावर महिलांसाठी चेंजिग रूम आदी कामे पूर्ण झाली असून वारकऱ्यांच्या सेवेसाठी आळंदी नगरपरिषद प्रशासन सज्ज झाले आहे. सर्व अधिकारी, कर्मचारी वारकऱ्यांना सुविधा पुरविण्यासाठी तैनात आहेत” – कैलास केंद्रे, (मुख्याधिकारी, आळंदी नगरपरिषद)