गडचिरोली – त्रिपुरामध्ये घडलेल्या घटनेनंतर महाराष्ट्रात अनेक शहरात हिंसाचाराच्या घटना घडल्याचे समोर आले. आज सांप्रदायिक, जातीवादाला खतपाणी घालणारा विचार जाणीवपूर्वक वाढवला जात आहे. त्रिपुरातील घटनांचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. तिथे काही घडल्यानंतर त्याची किंमत येथील लोकांनी का चुकवावी? ज्यांच्या हातात देशाची सूत्रे आहेत, त्या पक्षाच्या नेत्यांची भूमिका ही तेल ओतून आग वाढविण्याची होती, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज (वडसा) तालुक्यातील कार्यकर्ता आणि पदाधिकारी बैठकीस शरद पवार यांनी आज संबोधित केले. यानंतर त्यांच्याशी माध्यमांनी संवाद साधला. यावेळी शरद पवार म्हणाले, आज देशाची सूत्रे भाजपकडे आहेत. दोन दिवसांपूर्वी भोपाळ येथे आदिवासी संमेलन झाले होते. तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित होते. पण मला आश्चर्य वाटले, तिथे कुठेही आदिवासी हा शब्द वापरला नाही. त्याऐवजी वनवासी असा शब्द वापरण्यात आला. वनवासी हा शब्द आदिवासींना मंजूर नाही.
आम्ही मूलनिवासी आहोत, त्यामुळे आम्हाला वनवासी म्हणू नका, असे आदिवासी समाजाचे म्हणणे आहे. आज आपल्याला पर्यावरणाचा समतोल साधायचा असेल तर वनसंपत्ती, जंगल याचे रक्षण केले गेले पाहीजे. आदिवासी समाज हा जल, जंगल आणि जमीन या तीन गोष्टींचे संवर्धन करत आहे, असे ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांचे प्रत्युत्तर
आपल्यासारख्या मोठ्या नेत्यांनी वस्तुस्थिती जाणून घेत आणि पूर्ण माहिती घेत बोलले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संबोधनात जनजाती आणि आदिवासी असे शब्द वापरले आहेत.
आपली ही भाषा आदिवासी बांधवांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न आहे आणि ज्यांच्यासोबत आपण सभा घेत आहात, अशांची किमान माहिती घ्यायला हवी की त्यांच्यावर कशाप्रकारचे गुन्हे दाखल आहेत, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना प्रत्युत्तर दिले.