सातारा – वडूज येथे शनिवारी (दि. 25 सप्टेंबर) झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तालुक्यातील राजकारण्यांना इशारा दिला होता. “काहींना तुपात घोळलं’ तरी त्यांच्या कार्यपद्धतीत फरक पडत नसल्याने, मला लक्ष घालावे लागेल, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले होते.
अजितदादांच्या या वक्तव्याचा अर्थ प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने काढत असतानाच, खटाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठी घडामोड घडत आहे. सभापती शशीकांत देशमुख यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल करण्याची प्रक्रिया संचालकांनी सुरू केली आहे. त्यामुळे अजितदादांचा ‘लक्ष घालण्याचा’ सिग्नल आणि त्यानंतर मार्केट कमिटीत सुरू झालेला “बाजार’ याची चर्चा तालुक्यात आहे.
याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, उपमुख्यमंत्री अजित पवार हे एका कार्यक्रमासाठी गेल्या आठवड्यात वडूज येथे आले होते. त्यावेळी त्यांनी राजकीय भाष्य करताना, “काहींना तुपात घोळलं तरी, काहीही फरक पडत नाही. त्यामुळे आता मला लक्ष घालावे लागेल’, असा इशारा दिला होता. त्यांच्या या वक्तव्यावरून खटावच्या राजकाणावर गेले चार दिवस चर्चा रंगली होती. त्यांच्या या वक्तव्यावरून तर्कवितर्क लढवले जात होते.
दरम्यान, खटाव तालुका बाजार समितीचे सभापती आणि जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे यांचे खंदे समर्थक शशिकांत देशमुख यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्याच्या हालचाली संचालकांनी गतिमान केल्याने तालुक्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. समितीवर राष्ट्रवादीचीच सत्ता असताना, त्याच पक्षाच्या सभापतींवर अविश्वास ठराव आणला जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या पक्षांतर्गत बंडाळीमुळे भविष्यात पक्षाच्या नेत्यांमध्ये उभी फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.