पुणे – पुण्यातील मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणूकीला मी पहिल्यांदाच हजेरी लावली, हा अनुभव माझ्यासाठी खूप वेगळा आहे. गणपतीसाठी झालेली गर्दी, राजकरणापलिकडे जमलेले सर्व राजकीय नेते.. आणि भक्तीमय वातावरण पाहून मी भारावून गेलोय..त्यामुळे आता दरवर्षी मी नक्की पुण्यात पुन्हा येईल.. अशा भावना शिवसेनेचे युवा प्रमुख आणि माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केल्या. दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी गणेश मंडळांना भेटी दिल्याच पण त्याच वेळी त्यांनी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह मानाच्या पहिल्या कसबा गणपतीची पालखी खाद्यांवर घेतली. त्यानंतर ठाकरे यांनी पुण्यातील पत्रकारांशी अनौपचारीक संवाद साधला.
ठाकरे म्हणाले की, मला पुण्यातील ऐतिहासिज्क गणेशोत्सव मिरवणूक पहायची होती. मी पहिल्यांदाच पुण्यातील गणेशोत्सवाच्या मिरवणूकीला आलो आहे. इथले वातावरण पहायचे होते. त्यामुळे, मी गेल्या दहा दिवसात न येता थेट मिरवणूकीला आलो. हे वातावरण पाहून आपण भारावून गेले होतो. सर्वत्र भक्तीमय वातावरण असून ढोलताशांच्या गजर, भाविकांचा उत्साह डोळयात साठविणारा आहे. त्यामुळे, या पुढे मी नक्की पुण्यात या मिरवणूकीसाठी आवर्जून येणार आहे.
तरूणाईची गर्दी
दरम्यान, आदित्य ठाकरे यांना पाहण्यासाठी मिरवणूकीत आलेल्या तरूणांनी प्रचंड गर्दी केल्याचे पहायला मिळाले, त्यांनी भेटी दिलेल्या ठिकाणी तसेच ते वाहनातून उतरल्यानंतर उपस्थितांनी जोरजोरात त्यांच्या नावाने आवाज देत घोषणा दिल्या, तर ठाकरे यांनीही सर्वांना नमस्कार करून अभिवादन केले. त्यानंतर, मुख्य मिरवणूकीच्या सुरूवातीला ठाकरे पोहचले असतानाच; त्याच वेळी, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील त्या ठिकाणी उपस्थित होते.
ठाकरे हे पालखीकडे जात असताना पाटील यांनी त्यांना आवाज देत, आधी दर्शन घेण्यास सांगितले, त्यानुसार, त्यांनी दर्शन घेतले आणि पालखी जवळ आले. त्यानंतर या दोन्ही नेत्यांनी गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणा दिल्या. मात्र, त्यांच्यात इतर कोणताही संवाद झाला नसल्याचे पहायला मिळाले. तर याच भागात विरोधीपक्ष नेते अजित पवारही उपस्थित होते. मात्र, ठाकरे यांची पवार यांच्याशीही भेट झाली नाही.