अधिकाऱ्यांची हातावर घडी तोंडावर बोट
पिंपरी – नक्षलग्रस्त भागातून आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर गुन्हे शाखेची धुरा सोपविण्यात आली आहे. मात्र या नवख्या कर्मचाऱ्यांना तपासाची कार्यपद्धती आणि स्थानिक गुन्हेगारांबाबत काहीच माहिती नाही. यामुळे गुन्हे शाखेच्या कामगिरीवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे गुन्ह्यांचा उलगडा होण्याचा वेग मंदावला असून त्याचा फायदा गुन्हेगार घेऊ लागल्याचे चित्र शहरात पहावयास मिळत आहे.
गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकमधील सहायक उपनिरीक्षक रमेश नाळे याने खेड शिवापूर येथील एका भंगार विक्रेत्याला गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणून मारहाण करीत त्यांच्याकडे खंडणी मागितली होती. त्यामुळे 30 नोव्हेंबर 2018 रोजी तात्कालीन पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी नाळेसह तीन जणांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करीत त्यांना निलंबित केले. गुन्हे शाखेतील जुने कर्मचारी अशा प्रकारची कामे करीत असल्याच्या अनेक तक्रारी पोलीस आयुक्तांकडे आल्यामुळे त्यांनी गुन्हे शाखेतील जुन्या कर्मचाऱ्यांची बदली करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या जागी नक्षलग्रस्त भागातून आलेल्या नविन कर्मचाऱ्यांना संधी देण्यात आली. त्यानंतरही गुन्हे शाखेच्या कामगिरीचा आलेख वाढत नसल्याचे स्पष्ट झाल्याने दोन ऐवजी गुन्हे शाखेची पाच युनिट करण्याचा निर्णय पदम्नाभन यांनी घेतला. मात्र त्याचाही अपेक्षित परिणाम होत नसल्याचेच समोर आले आहे.
गुन्हे शाखेची पाच युनिट झाल्यावर सुरवातीला असलेली कार्यालयांची झालेली अडचणही सोडविण्यात आली. मात्र गुन्हे शाखेत आलेल्या नवीन कर्मचाऱ्यांना स्थानिक गुन्हेगारांची माहिती नाही. तसेच सीडीआर कसा वाचायचा, गोपनीय माहिती कशी काढायची, खबऱ्यांचे जाळे कसे विनायचे याबाबत काहीच माहिती नाही. यामुळे वरिष्ठ निरीक्षक किंवा इतर अधिकाऱ्यांना या कामात गुंतुन राहावे लागत आहे. गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण दिवसेंदिवस घटत चालले आहे. नुकत्याच झालेल्या क्राईमच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्येही गुन्हे शाखेच्या कामगिरीचा विषय चर्चेत आला होता. त्यावेळी काही अधिकाऱ्यांनी ही बाब वरिष्ठांच्या लक्षात आणून दिली. मात्र याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.
लवकरच गुन्हे शाखेच्या टीम बदलणार?
गुन्हे शाखेची ढासळती कामगिरी लक्षात येता पुन्हा एकदा गुन्हे शाखेत मोठ्या प्रमाणात बदल करण्यात येणार असल्याचे समजते. ज्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना गुन्हे शाखेत काम करण्याची इच्छा आहे, अशा कर्मचाऱ्यांकडून अर्जही मागविण्यात आले आहेत. येत्या काही दिवसात याबाबत निर्णय घेतला जाईल, असे सांगण्यात येत आहे.