चेन्नई – करोनाच्या साथीमुळे रोजगार बुडाले असल्यामुळे जवळपास अर्धा देश भुकेला आहे. असे असताना 1 हजार कोटी रुपये खर्च करून नव्याने बांधण्यात येत असलेल्या संसदेच्या नवीन इमारतीची काय गरज आहे? असा सवाल दक्षिणात्य अभिनेते आणि मक्कल निधी मयमचे प्रमुख कमल हासन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारला आहे.
संसदेच्या नवीन इमारतीची तुलना चीनच्या विख्यात भिंतीबरोबर करायची आहे का? असा प्रश्न कमल हासन यांनी विचारला. चीनमधील हुकुमशाही राज्यकर्त्यांमुळे भिंतीच्या बांधकामामुळे हजारोंचा बळी घेतला होता. मात्र या भिंतीमुळे चीनमधील नागरिकांचे रक्षणच होईल, अशी भूमिका तेथील राज्यकर्त्यांनी घेतली होती.
त्याचप्रमाणे करोनामुळे देशातील निम्मी जनता भुकेली असताना, 1 हजार कोटी रुपये खर्च करून नवीन संसदेच्या इमारतीचे बांधकाम कोणाच्या संरक्षणासाठी बांधली जात आहे, या प्रश्नाचे उत्तर पंतप्रधानांनी द्यावे, असे कमल हासन यांनी म्हटले आहे.
संसदेच्या नवीन इमारतीचा शिलान्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 10 डिसेंबरला झाला आहे. या इमारतीच्या बांधकामासाठी अंदाजे 1 हजार कोटी रुपये खर्च येणार असून 2022 पर्यंत ही इमारत बांधून पूर्ण होणार आहे.
तमीळनाडूतील विधानसभेच्या निवडणूकांसाठीच्या प्रचार मोहिमेला सुरुवात करण्यापूर्वी कमल हासन यांनी हा प्रश्न पंतप्रधानांना विचारला आहे. तमीळनाडूमध्ये विधानसभेच्या निवडणूका एप्रिल-मे महिन्यात होणार आहेत.