पुणे – राज्य शासनाने 2019 मध्ये नवीन महाबळेश्वर हिल स्टेशन करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी सातारा-8, जावळी – 15 आणि पाटण – 29 गावे अशा एकूण 52 गावांमध्ये हिल स्टेशन करण्यात येणार होते. आता मात्र राज्य शासनाने यामध्ये नव्याने 125 गावांचा समावेश केला असून एकूण 177 गावे मिळून नवीन महाबळेश्वर हिल स्टेशन उभारले जाणार आहे. या गावांमधील विकास करण्यासाठी शासनाने विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला नियुक्त केले आहे. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियमामध्ये नमूद केल्याप्रमाणे योग्य ती कार्यवाही करून नवीन महाबळेश्वर हिल स्टेशन विकसित करण्याकरिता 177 गावांच्या क्षेत्रासाठी विकास नियंत्रण नियमावलीसह सर्वसमावेशक नियोजन प्रस्ताव एमएसआरडीसीने तयार करावा लागणार आहे.
शासनाने घातलेल्या अटी 20 डिग्रीपेक्षा तीव्र उतारावर बांधकामास परवानगी नाही
नवीन महाबळेश्वर हिल स्टेशनमधील गावे व्याघ्र प्रकल्पातील अधिसूचित क्षेत्रात येत असल्याने या क्षेत्रात राष्ट्रीय वाघ्र संवर्धन प्राधिकरण नवी दिल्ली यांनी व्याघ्र प्रकल्पासाठी मंजूर केलेल्या व्याघ्र संवर्धन आराखड्याप्रमाणेच कामे करणे बंधनकारक राहील.
सद्यस्थितीत सातारा प्रदेशाच्या मंजूर प्रादेशिक योजनेचे नियम लागू राहतील. तसेच महाबळेश्वर पाचगणी प्रादेशिक योजनेच्या हद्दीपासून 2.50 किमी अंतरातील बफर झोनचे निर्बंध लागू राहतील.
मुख्यमंत्र्यांच्या गावाचा समावेश
नवीन महाबळेश्वर हिल स्टेशनमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दरे तर्फ तांब यांच्या गावाचाही समावेश करण्यात आला आहे. या नवीन हिलस्टेशनमुळे या 177 गावांचा नियोजनबद्ध विकास होणार असून निसर्गसंपदा जपण्याबरोबरच पर्यटनाला चालना मिळणार आहे.