क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे असे म्हटले जाते. ऋषभ पंतच्या आजवरच्या वाटचालीकडे पाहिले तर त्याची प्रचिती येते. या खेळाडूवर पराकोटीची टीका झाली. त्याचे संघातील स्थान कोण वाचवत आहे, अशा पद्धतीचे सवालही केले गेले. त्याची क्षमताच नाही, तो जबाबदार खेळाडू बनूच शकत नाही, अशी मुक्ताफळेही उधळली गेली. मात्र, ब्रिस्बेन कसोटीत त्याने ज्या पद्धतीने खेळ केला तो पाहता चमत्कारही घडू शकतो, यावर विश्वास बसला.
भारतीय संघात जेव्हापासून माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने निवृत्ती घेत जागा रिकामी केली तेव्हापासूनच सर्वाधिक संधी पंतलाच मिळाली होती. मात्र, त्याने प्रत्येक वेळी अत्यंत बेजबाबदार पद्धतीने खेळ केला व त्याचा फटका संघालाही अनेकदा बसला हेदेखील नाकारता येणार नाही. मात्र, त्याच्यापेक्षा सरस यष्टीरक्षकही भारतीय संघाला शोधता आला नाही, हीदेखील वस्तुस्थिती आहे. पंतला संघाबाहेर ठेवून वृद्धिमान साहा, संजू सॅमसन अशा अनेक खेळाडूंना खेळवून पाहिले गेले. मात्र, त्यातील एकालाही धोनीची जागा घेता आलेली नाही. यांना अपयश आले की पुन्हा पंतलाच संघात स्थान दिले गेले आहे. त्याने आजवर एकदाही आपली जबाबदारी ओळखून कामगिरी केलेली नव्हती. मात्र, “हर रात की सुबह नई’ असे म्हणतात त्याची प्रचिती ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत आली. एखाद्या खेळाडूचा पुनर्जन्म होतो हे संपूर्ण देशाने पाहिले. सिडनी कसोटी पाठोपाठ ब्रिस्बेन कसोटीत पंतने जबाबदारी ओळखून खेळ केला. ब्रिस्बेनवर पंतने यष्टीमागे सरस कामगिरी करण्यासह फलंदाजीतही कमाल केली. ब्रिस्बेन कसोटीत पंतने चेतेश्वर पुजारा, वॉशिंग्टन सुदंर यांना साथीला घेत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. त्याच्या याच कामगिरीची चाहते वाट पाहात होते.
प्रत्येक खेळाडूच्या कारकिर्दीत बॅडपॅच येतो. सर डॉन ब्रॅडमन वगळता जवळपास प्रत्येक खेळाडूला या अनुभवातून जावेच लागले आहे. सचिनही त्याला अपवाद नाही. पंतचा बॅडपॅच मात्र, संपण्याचे नावच घेत नव्हता. त्याच्याकडे गुणवत्ता ठासून भरली आहे यात वाद नाही, पण त्याची प्रचिती प्रत्यक्ष सामन्यात येत नव्हती हीच त्याच्याबाबत शोकांतिका होती. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीत पराभवाच्या उंबरठ्यावरून त्यानेच बाहेर काढले. त्याची नाबाद 89 धावांची खेळी संघासाठी मालिका विजयाचा आनंद घेऊन आली. पण याच खेळीतून ऋषभ पंत याचाही पुनर्जन्मच झाला हेदेखील खरे आहे. आता येत्या काळात भारतात इंग्लंडचा संघ येत असून त्याही मालिकेत पंतने अशीच जबाबदारी ओळखून खेळ केला तर भारताला अगदी धोनी मिळेल असे नाही, पण सईद किरमाणी, किरण मोरे किंवा नयन मोंगिया तरी निश्चितच मिळेल याची आता खात्री वाटते.
प्रत्येकाच्या आयुष्यात अपयश येत असते पण त्यातूनही जो खंबीरपणे उभा राहतो, समोर अलेल्या परिस्थितीशी दोन हात करतो तोच यशस्वी ठरतो, हे आता पंतलाही उमगले असेल. त्याने आजवर जितके सामने खेळले त्या सगळ्याला तसेच त्याच्यावरील दडपणाला ब्रिस्बेनच्या कसोटीने पूर्णविराम दिला आणि एक जबाबदार व मेहनती खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिले जाऊ लागले, असे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही.
– अमित डोंगरे