नवी दिल्ली – करोनाचा धोका संपेपर्यंत इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) खेळविण्याचा विचारही करणे शक्य नाही. आयपीएलच नव्हे तर कोणतीही स्पर्धा लोकांच्या जीवापेक्षा महत्त्वाची नाही, असे स्पष्ट मत किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे मालक व उद्योगपती नेस वाडिया यांनी व्यक्त केले आहे. तसेच ही स्पर्धा पुढे ढकलण्यास आपली हरकत नसल्याचेही त्यांनी सांगितले.
करोनाविरुद्धचा लढा म्हणजे तिसरे महायुद्धच वाटत आहे. या परिस्थितीतून जग लवकर बाहेर यायला हवे. लोकांचा जीव जास्त महत्त्वाचा आहे.सध्या केवळ भारताचीच नव्हे तर सर्व जगातील परिस्थिती पाहिली तर आयपीएलचा विचार करणेही मनात येत नाही. अत्यंत कठीण परिस्थितीचा आपण सामना करत आहोत. यातून कसे बाहेर यायचे हेच समजेनासे झाले आहे. त्यामुळे सध्या आयपीएलवर चर्चा करणेदेखील मानसिकतेच्या पलीकडे आहे.
आज जगातील कोणतीही स्पर्धा मग ती ऑलिम्पिक का असेना घेण्याचा विचार स्वप्नातही करता येणार नाही. मात्र, आयपीएल स्पर्धा पुढे ढकलली किंवा रद्दच केली तरी त्याला हरकत नसेल, असेही वाडिया यांनी स्पष्ट केले.