राष्ट्रवादीची खिल्ली उडवणाऱ्या मित्रपक्ष भाजपवर निशाणा
मुंबई: प्रवाह आणि हवा बदलत असते. पक्ष बनतात आणि कमजोरदेखील होतात. मात्र, कोणताच पक्ष कधीच कायमचा संपत नाही याचे भान राजकारणातील प्रत्येकाने ठेवायला हवे, अशा शब्दांत शिवसेनेने मित्रपक्ष भाजपवर राष्ट्रवादी कॉंग्रेसची खिल्ली उडवल्यावरून अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. त्यापार्श्वभूमीवर, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी या विरोधी पक्षांना गळती लागल्याचे चित्र आहे. त्याचा संदर्भ देऊन भाजपचे नेते विरोधकांवर प्रहार करत आहेत. त्याचा आधार घेऊन शिवसेनेने आपले मुखपत्र असणाऱ्या दैनिकातील अग्रलेखातून भाजपला कुठलाच राजकीय पक्ष कायमचा संपत नाही याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला आहे. येत्या काही दिवसांत राष्ट्रवादी संपेल. त्या पक्षात फक्त शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळेच उरतील, अशी टिप्पणी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पवार यांच्या महाराष्ट्रासाठीच्या योगदानाबद्दल सवाल उपस्थित केला. त्या टीकेला शरद पवार यांचे नातू रोहित यांनी प्रत्युत्तर दिले. गरज पडली की साहेबांचा (शरद पवार) सल्ला घ्यायचा अन् निवडणुकांवेळी त्यांनी काय केले असे विचारायचे, असे प्रत्युत्तर रोहित यांनी दिले.
त्या घडामोडींचा संदर्भ घेत शिवसेनेने एकप्रकारे रोहित यांच्या भूमिकेशी सहमती दर्शवतानाच राष्ट्रवादीवरही टीकेचा बाण सोडला आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीत पवारांचे योगदान आहेच आणि ते नाकारता येणार नाही. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारामतीत जाऊन मान्य केले. पवार गुरूस्थानी असल्याचे सांगत मोदींनी त्यांच्या राजकारण, समाजकारणास मान्यताच दिली, असे भाष्य अग्रलेखात करण्यात आले आहे. पवारांचा राष्ट्रवादी पक्ष एका फुटीतून उभा राहिला. त्यामुळे फुटलेलेच पुन्हा फुटले. राष्ट्रवादीला अभूतपूर्व अशी गळती लागली आहे. पवार यांनी ज्यांना वर्षोनुवर्षे वतनदाऱ्या आणि सुभेदाऱ्या दिल्या; ते उड्या मारून गयाराम बनले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणावरील पवारांची मूठ ढिली पडल्याचे ते लक्षण आहे, अशी टिप्पणीही पुढे करण्यात आली आहे.