आम्हाला 10 जागा द्याव्यात
मुंबई: माझा पक्ष रजिस्टर असताना भाजपच्या चिन्हावर का लढायच. आम्ही आमच्या चिन्हावर लढणार आहोत. रिपब्लिकन पक्षाने असे ठरवले आहे की पक्षाची ओळख वेगळी ठेवायची असेल तर आपल्या चिन्हावर लढले पाहिजे. मी महाराष्ट्र निवडणूक आयोगाशी बोलणार आहे. स्वतंत्र चिन्ह द्यावे त्यासाठी प्रयत्न आहे, अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली. युतीतील मित्रपक्षांपैकी रिपाई हा सर्वात मोठा पक्ष असल्याने आम्हाला 10 जागा द्याव्यात अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. 22 ते 23 जागांची यादी दिली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
रामदास आठवले म्हणाले, विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप 135-135 आणि मित्रपक्ष 18 जागा असा फॉर्म्युला लोकसभा निवडणुकीवेळी ठरला होता. भाजप-शिवसेना फायनल होईल त्यावेळी आम्हाला कुठल्या जागा द्यायच्या हे ठरेल. समस्या ही आहे भाजपने गेल्यावेळी आम्हाला ज्या 8 जागा दिल्या, त्या सर्व जागांवर शिवसेनेचे उमेदवार निवडून आले आहेत. जर आरपीआयला सोबत ठेवायचे असेल तर काही सिटिंग जागा शिवसेना भाजपकडून मिळायला हव्यात ही अपेक्षा आहे.
आम्ही आमच्या चिन्हावर लढणार आहोत. आमच्या चिन्हावर लढलो आणि आमचे 5 ते 6 आमदार निवडून आले तर ते आमचे असतील. नाहीतर देशभरात संदेश जाईल की भाजपच्या चिन्हावर लढल्यामुळे ते आमदार भाजपचे आहेत.
यावेळी युतीसाठी वातावरण अत्यंत पोषक आहे. मी यापूर्वी 3 वेळा खासदार म्हणून लोकसभेत निवडून गेलो. तेव्हा ना कधी कॉंग्रेसचा पंजा घेतला ना राष्ट्रवादीचे घड्याळ घेतले. मी माझ्या चिन्हावर निवडून आलो. त्यामुळे असे म्हणता येणार नाही की रिपाईच्या चिन्हावर जिंकता येत नाही. कमळाचा फायदा होऊ शकेल. पण शिवसेना-भाजपचा पाठिंबा राहिला तर आणखी चांगले होईल, असे आठवलेंनी सांगितले.