पुणे – बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव महापालिकेकडून तयार करण्यात येत आहे. याबाबत नाट्यप्रेमी, कलाकार तसेच सांस्कृतिक क्षेत्रात वेगवेगळे मतप्रवाह असले, तरी पुनर्विकासाची चर्चा सुरू झाल्यानंतर गेल्या काही वर्षांत नाट्यगृहाच्या देखभाल-दुरुस्ती तसेच सोयी-सुविधांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. पुनर्विकास गृहीत धरूनच आवश्यक निधी, मनुष्यबळ आणि नाट्यगृहातील सुधारणांबाबत प्रशासन डोळेझाक करत असल्याचे वास्तव आहे.
बालगंधर्व रंगमंदिरला कलावंत आणि प्रेक्षकांची विशेष पसंती आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असल्याने पोहचणे सोयीचे, प्रशस्त आसन व्यवस्था, पार्किंग सुविधा असल्याने नाटक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी बऱ्याच संस्था बालगंधर्व रंगंमंदिरास पसंती दर्शवतात. महापालिकेचे हे एकमेव सभागृह असे आहे, जेथे वर्षभर काही ना काही कार्यक्रम सुरूच असतात. तर, चार महिने आधी बुकिंग करावे लागते. असे असतानाही, गेल्या काही वर्षांत नाट्यगृहांच्या स्वच्छतेचा प्रश्न वारंवार समोर आला असून, नाट्यकलावंतांनीही त्यावर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.
अनेकदा एसी बंद असणे, सभागृहातील दिवे बंद असणे, सभागृहाच्या आतील भागात अस्वच्छतेमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढणे अशा अनेक तक्रारी वारंवार येत असतानाही त्याकडे डोळेझाक केली जात आहे. यापूर्वी महापालिकेने रंगमंदिरात खुर्च्या बदलल्या आहेत. त्यानंतर पुनर्विकासाची चर्चा सुरू झाली आणि कोणतेही मोठे काम झालेले नाही.
जबाबदारीची चालढकल
या नाट्यगृह व्यवस्थापनाची जबाबदारी मनपा सांस्कृतिक व क्रीडा विभागाकडे असली, तरी त्याची देखभाल दुरुस्तीची कामे मात्र भवन विभाग करतो. तर स्वच्छतेचे काम आधी घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे होते. तर एसीचे आणि दिवाबत्ती विषयक कामे विद्युत विभागाकडे आहेत. पण, त्यांच्यातच समन्वय नसल्याने त्याचा फटका रंगमंदिराच्या देखभाल दुरुस्तीला बसला आहे.