ती येते आणिक जाते…
येताना ती कधी कळ्या आणि ते
अन् जाताना फुले मागीते…
खरेच किती सुंदर नितांत भाव आहेत हे! प्रेयसीचं येणं, भेटणं अन् निघताना त्या भेटीचा आनंद चेहऱ्यावर फुलणे हे जणू कळ्यांची फुलं होण्यासारखेच असावे नाही का? अल्लड, खट्याळ प्रेयसीला उद्देशून गितकाराने गीत रचताना भेटीचे जे फलित वर्णीलेय, ते नक्कीच सार्थ. भेटीची सार्थकता अशीच असावी; तू-तू, मै-मै करून भेटीची मजा जाऊन फक्त झुरणे आणि व्याकुळपण उरले तर त्या भेटीत कळ्यांची फुलं न होता कळ्या उमलण्या अगोदर कळ्यातच संपतील. मग नात्यातही दुरावा निर्माण होत राहील अन् एक दिवस हे नातंही निर्जीव होईल. म्हणूनच कवीची ही कल्पना अफलातून!
कधी कधी मी विचार करते की कळ्यांची फुलं होण्याची कल्पना फक्त प्रेयसी अन् प्रियकर भेट इतकीच मर्यादित नाही तर जीवनातल्या प्रत्येक गोष्टीबाबत अन् नात्यांबाबत असावी. ती येते… मनात कल्पना येते अन् तिला शब्दरूपात बद्ध करून भावनांच्या जोडीने कवितेची फुलं उमलतात म्हणजेच कल्पनेची ही कळी जोपर्यंत मनात अवतरते तेव्हाच तिचे फूल करण्याची जबाबदारी येते. चित्रकाराला चित्रांची कल्पना सुचते अन् मग अप्रतिम जिवंत चित्र चितारले जाते!
कथेची कळी अशीच उत्स्फूर्त कुठंतरी अवचित मनात येत असते लेखक मग तिचे फूल बनवतो! उचकी लागते अन् थांबते पण जाताना प्रिय माणसाची आठवण देते. समुद्राची गाज किनाऱ्यावर येते अन् जाताना गाजेच्या खुणा रेतीत उमटवते. जीवनातली प्रत्येक गोष्ट येते न जाते. कधी ती क्षणिक, कधी तात्पुरती, कधी खूप वेळेकरता येते न जाते पण जाताना ती कशी जाते? त्या मधल्या काळाला खूप महत्त्व आहे. कोणतीही गोष्ट आपल्याजवळ असते तेव्हाच तिचे फुलणे, बहरणे झाले तर ती गोष्ट आपल्याला आनंद देऊन जाते.
कवितेचे फुलणे, चित्राचे कागदावर उतरणे, शिल्पकाराचे शिल्प कोरणे या अन् अशा कितीतरी अद्भुत, अवर्णनीय, सुंदर, आश्चर्यकारक गोष्टी या मधल्या काळामधेच घडल्या. येणे-जाणे मधेच! येणे-जाणे हे नैसर्गिक असते. येताना प्रत्येक गोष्ट, कळी, कच्ची असते पण जाताना ती कशी जाते हे महत्त्वाचे नाही का? माणसाचे अंतरंग अन् कृती या जाण्यावर ठसा उमटवते अन् ती गोष्ट फक्त वैयक्तिक आनंद न रहाता वैश्विक बनते.
जीवनात किती तरी छोटे छोटे आनंदाचे क्षण येतात; पण तिकडे दुर्लक्ष करणे अन् ते क्षण न अनुभवल्याने क्षणांचे फुलणेही होत नाही अन् आनंद घेणेही! आयुष्यात कितीतरी माणसे येतात-जातात; नात्याचंही असेच असते ती जपली तर फुलतात अन् फुलली तर आनंद देतात. अन्यथा उमलण्यापूर्वीच कधी गळून पडतात कळतही नाही! जेव्हा नाती एकत्र येतात तेव्हा जाताना ती आनंदाने फुलून निरोप घ्यावीत. जीवनात आलेली एखादी व्यक्ती आनंदाने बहरून आपल्याजवळून गेली तर बहरल्यानंतर पसरलेल्या सुगंधाने आपले जीवन सुगंधी होते.
मानवी जीवनही असेच असते नाही का? तो येतो अन् जातो पण जाताना ते फूल होऊन सुगंध पसरून जातो की नाही? यावरच जन्माची कृथार्थता आहे, नाही का? नाहीतर, जो आला तो रमला पण शेवटी गेला… असेच आपलेही!
परमेश्वर प्रत्येकालाच अशा ओंजळभर कळ्या देत असतो. कधी एकदम देतो, कधी एक एक देतो आणि ओंजळ भरतो. आपल्या ओंजळीत त्याची फुले होणार की कोमेजणार? हे आपले कर्म अन् कर्तृत्वच असते! जीवनात प्रत्येक गोष्ट येते-जाते. जाताना ती खरेच फुले मागते कारण तिची अपेक्षा असते आपलेही फूल व्हावे.
– सुचित्रा पवार