फलटण -मी नगराध्यक्ष असताना दिल्लीतून निधी आणला. तुमच्यात हिंमत असेल तर केंद्रातून 372 कलम रद्द करा आणि मग नीरा देवघरच्या गप्पा मारा व केंद्रातील मंत्र्यांना काही कामे आहेत की नाहीत, उठसूठ फलटण दौऱ्यावर येत आहेत. मी बारामतीला पाणी दिले म्हणून सांगत सुटले आहेत. पण त्याच शरद पवार यांनीच निधी दिला म्हणून नीरा देवघर धरण बांधले आहे, असे आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
शुक्रवार पेठेत आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात आमदार रामराजे बोलत होते. मला अमृतमहोत्सवी शुभेच्छा द्यायच्या असतील तर माझ्या राजकारणाची जिथून सुरुवात झाली ती नगरपालिका जिंकून द्या, असे भावनिक आवाहन करीत त्यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर सडकून टीका केली. फलटण पालिकेत मीच सत्ता स्थापन करणार, मी नगराध्यक्ष असताना कामे केली तेवढीही कामे खासदारांना करता आली नाहीत. मी खासदार असतो तर दिल्ली लुटून आणली असती, असे त्यांनी सांगितले. खासदार सरळसरळ खोट बोललं आहेत. खूप कामे केलीत असे भासवायचा त्यांचा प्रयत्न असून राज्यात सत्तांतर झाल्याने थोडा परिणाम झाला आहे. मात्र, फलटण मध्ये सत्तांतर होऊच शकत नाही, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नाईकबोमवाडीमध्ये कोण कारखानदार येणार, तुमचाच उपळवे येथील कारखाना तिकडे न्या. बाणगंगा धरणात यांच्या कारखान्याचं पाणी जाऊन पाणी दूषित झाले आहे, ” असे त्यांनी सांगितले. मी तुम्हाला घाबरत नाही. कोणाला यायचं त्यांनी फलटणमध्ये यावं, तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांना मी कधीही वाऱ्यावर सोडणार नाही, डोळे मिटेपर्यंत मी तुमची साथ सोडणार नाही, सुससंकृतपणा सोडणार नाही, असे स्पष्ट करीत त्यांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले. शुक्रवार पेठ मंडळाचे माजी अध्यक्ष राहुल निंबाळकर यांनी प्रास्ताविक केले.
मेळाव्यास सुभद्राराजे नाईक निंबाळकर, शिवाजीराव घोरपडे गजेंद्रगडकर, नितीन भैय्या भोसले, चंद्रकांत शिंदे, सुदामराव मांढरे, भीमदेव बुरुंगले, भरत सुर्यवंशी (बेडके) भाऊसाहेब कापसे, प्रगतीताई कापसे, किशोर नाईक निंबाळकर, निलेश खानविलकर, सुनील मठपती, मेघाताई सहस्त्रबुद्धे, संतोष वेलणकर, अनिल वेलणकर, यशपाल भोसले पाटील, पप्पू शेख,बापूराव देशमुख, संजय पालकर, विजय पालकर, अनिल जाधव, शेखर हेंद्रे, किशोर ताराळकर, अमर खानविलकर, अतुल यादव, आदेश देशमुख, विकास कर्वे, सुनील पवार, बाळासाहेब जानकर, सुरेश पवार, तात्या तेली, फिरोज बागवान, जितेंद्र मठपती, तेजसिंह इंगळे, किशोर देशपांडे व शुक्रवार पेठ तालीम मंडळ सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व पैलवान मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इथं सत्ता श्रीरामाची
राज्यात व दिल्लीतून किती नेते येऊ द्या. इथं श्रीरामाची सत्ता आहे. तब्बल 30 वर्षे झटून फलटण आधुनिक शहर केलंय, कुठंही असलो तरी माझं फलटण शहर व तालुक्यातील प्रत्येक गावात लक्ष असतं, मी त्यांचं नाव घेणार नाही. पण सध्या राजकारण खालावतयं, कार्यकर्त्यांना धमक्या येत आहेत. नगरपालिका ताब्यात द्या म्हणतायत, नगरपालिकेमध्ये कामच राहील नाही तर तुम्ही काय कामे करणार, असा रोखठोक सवाल करत येणाऱ्या पालिका निवडणुकीत मी त्यांची लायकी दाखवणार, असे रामराजे यांनी स्पष्ट केले.