राहुरी विद्यापीठ -बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांपुढील आव्हानामध्ये वाढ झालेली आहे. शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ मिळविणे जेवढे महत्त्वाचे तेवढेच गारपीटसारखी समस्या निर्माण झाल्यानंतर शेतकऱ्याने काय काळजी घ्यायची याविषयी प्रसारमाध्यमाचा पुरेपूर वापर करून शेतकऱ्यांना वेळेवर व योग्य असा मेसेज देता आला पाहिजे. सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांचे प्रश्न वाढलेले आहेत. कृषी तंत्रज्ञान प्रसार होण्यासाठी कृषी विभागातील कर्मचाऱ्यांनी, कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी तसेच विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी प्रसार माध्यमांचा प्रभावीपणे वापर करावा, असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजाराम देशमुख यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या कास्ट-कासम प्रकल्पाअंतर्गत प्रसारमाध्यमांचा कृषी तंत्रज्ञान प्रसारात प्रभावी वापर या विषयावर शेतकरी, विद्यार्थी-विद्यार्थिनी, विद्यापीठाचे कर्मचारी-अधिकारी, कृषी विज्ञान केंद्राचे विषयतज्ञ, कृषी विभागाचे व पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे कर्मचारी, अधिकारी यांच्यासाठी ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा होते.
यावेळी अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलसचिव तथा प्रमुख, कृषी विस्तार शिक्षण विभाग डॉ. प्रमोद सावंत, मुंबई दूरदर्शन केंद्राचे माजी उपमहासंचालक शिवाजी फुलसुंदर, प्रशिक्षणाचे संयोजक डॉ. सुनील गोरंटीवार, सहसंयोजक डॉ. मुकुंद शिंदे, प्रशिक्षणाचे संयोजन सचिव तथा धुळे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मिलिंद अहिरे, सह संयोजन सचिव तथा कृषी विस्तार व संवाद विभागाचे प्रमुख डॉ. सुभाष चंद्र शिंदे उपस्थित होते. यावेळी डॉ. अशोक फरांदे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. सुनील गोरंटीवार यांनी प्रशिक्षणाबद्दल माहिती दिली. प्रशिक्षणाचे आयोजन सचिव डॉ. मिलिंद अहिरे यांनी उद्देश सांगितला.