जामखेड – महाराष्ट्रातील गरिब मजुरांची पायपीट अद्याप थांबलेली नव्हती. ही गरज ओळखून नगर येथील “युवान’ या सामाजिक संस्थेमार्फत जालना जिल्ह्यातील 25 मजुरांची दोनशे कि.मी.ची पायपीट थांबवून त्यांना घरपोच बसने पाठवले तसेच तालुक्यातील बसरवाडी येथे दोन महिन्यापासून बुलढाणा जिल्ह्यातील 16 मजुरांना घरपोच बसने पाठवून युवान संस्थेने महाघरवापसी अभियान सुरु आहे.
शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास वाई ( जिल्हा सातारा) येथून मजुर लहान मुलांसह पायी चालत जामखेडच्या दिशेने येत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांना मिळताच त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहासमोर असलेल्या सावलीच्या झाडाखाली थांबवून ठेवले व तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना माहिती दिली. या दरम्यान युवक कार्यकर्ते संजय कार्ले यांनी या लोकांची पायपीट पाहून विचारपूस केली. त्यांनी तातडीने मागील दोन महिन्यांपासून मोफत गोरगरिबांना भोजन देणारे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष पांडूराजे भोसले यांना सांगितले त्यांनी उपाशीपोटी असलेल्या मजुरांना जेवणाची सोय केली.
या मजुरांची नगर येथील युवान सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संदीप कुसाळकर यांना याबाबत माहिती दिली. त्यांनी आपण राज्यातील व परप्रांतीयांची बसने जाण्याची व्यवस्था करत असतो. याबाबत सहकारी सुरेश मैड, हेमंत लोहगावकर, पांडुरंग काळे, आदर्श ढोरजकर, ऍड. विनायक सांगळे, कार्पे औरंगाबादच्या नताशा झरीन यांच्या बरोबर चर्चा करून तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना परवानगी मागितली. त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथील मजूर असून तालुक्यातील बसरवाडी येथे पाल ठोकून राहत आहेत. त्यांना पण गावी जायचे आहे. त्यांची आरोग्य तपासणी केली. पण शासनाकडून बसची व्यवस्था नाही. तुम्ही करावी असा शब्द कुसाळकर यांना टाकला. त्यांनी तात्काळ होकार दिला व खर्डा येथील बसची व्यवस्था केली.
नायब तहसिलदार नवनाथ लांडगे, विजय गव्हाणे यांनी प्रशासकीय बाबी तात्काळ पूर्ण केल्या. तोपर्यंत रात्रीचे सात वाजले. रात्री एकच्या सुमारास सर्व मजूरांना तहसीलदार विशाल नाईकवाडे, पांडुराजे भोसले व त्यांचे सहकारी, अशोक निमोणकर यांनी रवाना केले. बीड हद्दीत बस जाताच परवाना असूनही त्यांना सोडले नाही. त्यामुळे रात्री दोनच्या सुमारास बस पुन्हा जामखेड, हळगाव, चोंडी, नगर औरंगाबाद, जालना व मंठा तालुक्यातील टोकेवाडी व पाटोदा येथे बसचालक राजू सय्यद व गणेश पवार यांनी सोडले व उर्वरित मजुरांना लोणार येथे घरपोच सोडले. दहा तासांच्या प्रवासानंतर सर्व मजुर सुखरूप पोहचले. युवान सामाजिक प्रतिष्ठानने मजुरांची पायपीट थांबवून त्यांना घरपोच बसने पाठवण्याचा उपक्रम राबविला त्यांनी यापूर्वी नांदेड, जळगाव येथील मजुरांना बसने घरपोच पाठवून कोरोना महामारीच्या काळात आपले कर्तव्य पार पाडले.