अरुण गोखले
माणसामधला माणूसपणा, माणुसकी जागवावी. कारण माणसाला त्याच्या बहुभाग्याने प्राप्त झालेल्या या नरजन्माचे कल्याण करून घेण्यासाठी, हा जन्म सार्थकी लावण्यासाठी प्रेरित करणे, हेच साधू-संत आणि महात्मे यांचे कार्य आहे. कारण असे की, एकदा का आपण मनुष्य म्हणून जन्मास आलो की आपण माणूस म्हणूनच मरणार, हेही तितकेच सत्य आहे. इथे विचार करण्याचा मुद्दा हा आहे की, या जन्म-मरणाच्या मधल्या कालावधीत म्हणजेच आम्ही आमच्या जीवनात माणूस म्हणून जगतो का?
केवळ जन्मला, जगला आणि मेला याला काय जीवन म्हणायचे का? यासाठीच संतबोध हाच आहे की, तुम्ही माणूस म्हणून जन्मलात ना, मग माणूस म्हणून जगा. माणुसकीचा धर्म पाळा, माणसांशी माणसासारखं वागा. तुमच्या भोवतालची माणसं, पशु-पक्षी, निसर्गावर भरभरून प्रेम करा. प्रेम द्या आणि प्रेम घ्या.
परस्परातील सुख-संवादासाठी केवळ चार प्रेमाचे, आपुलकीचे, जिव्हाळ्याचे शब्द पुरेसे असतात. लहान मुलांना हवा असतो तुमचा गोड सहवास, एक गोड पापा, ते त्यांना द्या. घरातल्या तुमच्या जोडीदारास हवा असणारा सहकार्याचा आपलेपणाचा हात पुढे करा. घरातील वृद्धांची, आई-वडिलांची आपुलकीने चौकशी करा, त्यांना हवे नको ते पाहा. विसरू नका की ते केवळ तुमच्या प्रेमाचे, आपलेपणाचे भूकेले असतात.
घरातल्या प्राण्यांनाही जीव लावा. बघा ते त्याचे इमान राखतात का नाही. प्रेमाने तुमच्या पायात घोटाळतात की नाही. हे सारं सारं तुम्हा आम्हाला सहज करता आणि अनुभवता येण्यासारखे आहे. पण त्यासाठी आपण आपलं माणूसपण हे जपायला हवं.
जर निसर्गातले इतर प्राणी हे त्यांचा स्वभाव धर्म पाळत असतील तर तुम्ही तुमचा मानवता धर्म हा पाळायला, सांभाळायला नको का? परस्परांबद्दल प्रेम, आस्था, जिव्हाळा, आदर, भूतदया दाखविणे हे माणसाचे काम नाही का? त्याने नीतीमूल्यांची पायमल्ली करीत केवळ स्वत:चा स्वार्थ, लोभ, मद, मोह, मत्सर आणि विषय वासनेपायी इतरांशी पशुवत वागायचे, ही काय माणुसकी झाली का?
आम्ही माणूस म्हणून जन्मास आलो आहे ना, मग आम्ही माणसासारखं वागणार, माणूस जोडणार आणि आमचं सर्वांशी असलेलं माणुसकीचं नातं टिकवणार, हे निश्चयपूर्वक ठरवायला नको का?