अरुण गोखले
माणसाचं शरीर हे घाम, धूळ याने मलीन होते. त्यास अति कष्टाने थकवा येतो. हा थकवा, शीण, अस्वच्छता दूर करण्यासाठी आपण छानपैकी गार किंवा गरम पाण्याने मनसोक्त आंघोळ करतो. त्या आंघोळीने शरीर कसे मस्त छान अन् ताजेतवाने होते. आपण जशी शरीराला आंघोळ घालतो तशी मनाची मलिनता दूर करण्यासाठी मनाला आंघोळ घालतो का? असा एक प्रश्न हा खरं तर प्रत्येकानेच स्वत:ला विचारायला हवा.
कारण माणसाच्या आरोग्य आणि स्वास्थ्यामध्ये शरीराच्या इतकीच मनाच्या स्वच्छतेची आणि स्वास्थ्याची नितांत गरज आहे हे विसरून चालणार नाही. आपल्याकडे ज्या प्रकारे आरोग्यशास्त्राने शरीर स्वच्छतेसाठी नित्य स्नान करा, वारंवार हात, पाय, तोंड स्वच्छ धुवा हे जसे सांगितले आहे तसेच आध्यात्मामध्ये आपल्या मनाच्या स्वच्छते आणि स्वास्थ्यासाठी तीर्थ क्षेत्रातल्या पवित्र नद्यांचे संगमस्थानाचे, समुद्रस्नानाचे उपाय सांगितले आहेत.
या पवित्र आणि पापनाशनी नद्याचे जल हे शरीराबरोबरच आपल्या मनाची मलिनता दूर करीत असते. पवित्र जलस्नानाने मन प्रसन्न होते. त्यातला कुविचार, विषय, वासना, पूर्वग्रह, दुराग्रह ह्या सारखी घाण दूर होते. मन शुद्ध सात्विक आणि निर्मळ होते, पण पवित्र नद्यांतील आंघोळ तुमचे पाप, दुष्कर्म धुऊन टाकत नाही, हे येथे लक्षात घ्या, पण तुम्ही पुन्हा कोणतेही पाप, दुष्कर्म करणार नाही, याकडेही लक्ष द्या. पवित्र नद्यांतील आंघोळीने तुमचे मन स्वच्छ होऊ शकते. हे मन पुढील आयुष्यात स्वच्छच ठेवा.
त्यासाठी आपल्या आध्यात्मशास्त्राने साधा सुलभ उपाय दिला आहे. तो म्हणजे तुम्ही तुमच्या घरात स्नान करीत असताना हर हर गंगे असे म्हणून त्या पवित्र नद्यांच्या जलाचे स्मरण करून मनास नामगंगेचे स्नान घाला. विवेकाची विचारांची मनाची आंघोळ कशी घालायची हे संत सद्गुरू आपल्याला सांगतात, शिकवतात.
ते सांगतात की, प्रथम तू तुझं ते चंचल मन श्रद्धेच्या पाटावर घट्ट बसव. त्याच्या मस्तकावर नामगंगेचे पाणी घाल. त्यास विवेकाचा साबण लाव. विचारांचे मर्दन कर. ईश्वर नाम गंगेत त्यास स्वानंदाच्या डुब्या मारू दे. मग त्यास संत बोधाच्या वस्राने पुसून काढ. त्याला ईश्वराच्या दर्शनाचा आरसा दाखव.
मनास दृढ निष्ठेचे चंदन लाव. त्याच्या गळ्यात सुवासिक सुविचारांची माळ घाल. त्याच्या समोर अहंकाराचा कापूर लाव. त्याची ज्ञान दीपाने ओवाळणी कर आणि मग बघ तुझा मन देव्हारा हा कसा छान सुंदर उजळून निघतो की नाही ते.