– विधिषा देशपांडे
लग्न मग ते ठरवून केलेलं असो की प्रेमविवाह दोन्हीकडे “थोडं तुझं थोडं माझं’ हा मंत्र जपतच वाटचाल करावी लागते. मात्र, याची बहुतांश जबाबदारी स्त्रीवर आपसूक येते. या बदलाला आजची स्त्री कशी सामोरी जातेय? लग्नानंतरच्या तडजोडीबद्दल काय आहेत त्यांची प्रातिनिधिक मतं?
लग्न मग ते प्रेमविवाह असो की ठरवून केलेलं त्यात तडजोड ही करावीच लागते अशी मानसिकता अनेकींची आढळून आली आहे. म्हणजे लग्नाकडे गांभीर्याने पाहणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे असं म्हणायला हरकत नाही. आपल्या अपेक्षा काय असाव्यात आणि त्यांची पूर्तता होण्याची शक्यता किती आहे याचंही गणित अनेकींनी मांडलेलं दिसलं. त्यामुळे अवास्तव अपेक्षांच्या मागे आजच्या सुशिक्षित मुली लागत नाहीत, असं म्हणायला हरकत नाही.
नोकरी करणाऱ्या मुलींच्या अपेक्षा व्यवसाय करणाऱ्या मुलींच्या तुलनेत कमी आहेत. त्यांना आपल्याला लग्नानंतरही नोकरी करायला मिळावी आणि त्यासाठी काही तडजोडी कराव्या लागल्या तर त्या नवरा-बायको दोघांनी मिळून कराव्यात अशी त्यांची सर्वसाधारण अपेक्षा असते. लग्नाच्या पहिल्या दोन-तीन वर्षांत ती पूर्ण होतानाही दिसते. कारण तेव्हा वाढत्या सांसारिक जबाबदाऱ्या नसतात. बऱ्याचशा घरात “नोकरी करणारी सून’ हवी असल्याने तिच्या करिअरला किंवा नोकरीला सांभाळून घेण्याकडे कल असतो.
काही घरात तर सासूबाईंनी इतकी वर्षे नोकरी केली आणि आता सुनेला नोकरी करता यावी म्हणून त्यांनी घराची जबाबदारी सांभाळली आहे, असं चित्र दिसू लागलं आहे. व्यवसाय करणाऱ्या मुलींना मात्र आजकाल आपल्याच क्षेत्रातला मुलगा हवा असतो. आपल्या क्षेत्रातल्या मागण्या आणि वेळेची बंधनं यावर तो आक्षेप घेणार नाही आणि आपल्याला योग्य तो सल्ला देऊ शकेल, असं आज त्यांना वाटू लागलं आहे. एक काळ होता जेव्हा डॉक्टर किंवा आर्किटेक्चर, इंजिनिअर मुलांची आपल्याच क्षेत्रातली मुलगी पाहिजे ही मागणी होती;
पण आज सी.ए. किंवा इव्हेंट मॅनेजमेंट किंवा अगदी फॅशन डिझायनर मुलींनाही आपल्याच क्षेत्रातला नवरा हवा अशी मागणी करावीशी वाटू लागली आहे आणि त्यांची मागणी विचारात घेतली जाते हे महत्त्वाचं. प्रेमविवाहाला विरोध न होता झालेली लग्नं किंवा ठरवून केलेली लग्नं आणि घरच्यांचा विरोध पत्करून केलेले प्रेमविवाह यांच्यातील लग्नाआधीच्या आणि नंतरच्या अपेक्षांमध्ये मूळातच तफावत असते.
विरोध पत्करून केलेल्या प्रेमविवाहात नवऱ्याने सहकार्य करावं आणि त्यांचं आपल्यावरचं प्रेम या दोनच गोष्टींना महत्त्व दिलेलं दिसतं. कदाचित लग्नाआधी त्यापेक्षा काही वेगळ्या परिस्थितीलाही तोंड द्यावं लागेल याचा विचार झालेला नसतो. त्यामुळे लग्नानंतर नवऱ्याचं वागणं बदललंय असा अनुभव अनेकींना येतो. पेशाने शिक्षिका असलेल्या एकीला आज लग्नाआधीच्या कोणत्याच अपेक्षा पूर्ण झालेल्या नाहीत, असं जाणवतं.
घरच्यांचा विरोध पत्करून लग्न केल्याने आता ते कोणाला सांगताही येत नाही, पण “लग्नाआधीचा प्रियकर आता टिपिकल नवरा झालाय’ असं तिला वाटतं. काही तडजोडी लादल्या गेल्या आहेत, असंही वाटतं, पण त्या स्वीकारण्याशिवाय काही पर्याय नाही, असं तिला वाटतं.
आंतरजातीय विवाह करणारी एक तरुणी लग्नाआधीच्या अपेक्षा आणि नंतरची परिस्थिती यातील तफावतींना सामोरी जातेय. अनोळखी शहरात एकटे राहात असताना मानसिक आधार देणारा मित्र म्हणून आवडलेला मुलगा आता लग्न झाल्यावर आपल्याकडूनच तडजोडीची अपेक्षा करतो हे तिला खटकतं. “लग्नाआधी मला समजून घेणाऱ्या नवऱ्याला आता लग्नानंतर नव्या घरात ऍडजेस्ट होताना मला होणारा त्रास दिसत नाही.
तडजोडी कराव्याच लागतात हे तो मला जितक्या सहजपणे सांगतो, तेवढाच तो या सगळ्यापासून दूर राहतो’ ही भावनिक तडजोड का करायची हा प्रश्न तिला पडतोच. प्रेमविवाहात घरच्यांचा विरोध असताना लग्न करताना तडजोडी या एकाच मुद्द्यावर खूप विचार व्हावा आणि त्या एकतर्फी नसाव्यात, असा ती आग्रह धरते. कारण नंतर त्यावर विचार करण्याची वेळ निघून गेलेली असते.
माहेरच्यांनी आधार काढून घेतलेला असल्याने मन मोकळं करायला कोणीच नाही आणि ज्याच्या भरवशावर हा निर्णय घेतला त्यालाही आपल्या तडजोडींशी काही देणंघेणं नाही अशा विचित्र कात्रीत सापडलेल्या या तरुणींना लग्नाआधीची स्वप्नं आणि नंतरचं वास्तव यातला फरक निश्चितच जाणवतोय.
दुसरीकडे ठरवून लग्न केलेल्या मुलींमध्ये तडजोडीशिवाय पर्याय नाही हा विचार मूळ धरताना दिसू लागलाय. ठरवून केलेल्या लग्नात मुळातच काही गोष्टींशी मनात तडजोड झालेली असते. कोणालाच स्वप्नातला राजकुमार मिळणार नाही एवढी प्रगल्भता शिक्षणाने मुलींमध्ये आलेली आहे. एकत्र कुटुंबातील स्थळ स्वीकारून तिथूनच तडजोडीला सुरुवात केलेल्या एका तरुणीला वाटतं की, “लग्नानंतर तडजोड करावी लागणं ही स्वाभाविक गोष्ट आहे.
मुलगी नवीन घरात येते तेव्हा तिथल्या वातावरणाशी जुळवून घेताना तिला आणि त्या घरातल्या माणसांनाही तडजोडी कराव्याच लागतात. ती करणं दोन्ही बाजूंनी आवश्यक असतं. तसं झालं तरच घरातील वादावादीचे प्रसंग टाळता येतात. एकत्र कुटुंबाची सवय नसल्याने तिथे काय तडजोडी कराव्या लागतील याची कल्पना नव्हती, पण ही तडजोड दोन्ही बाजूंनी झाल्याने त्याचा फायदा अधिक झाला’
तडजोड ही फक्त व्यक्ती किंवा त्याच्या स्वभावातील फरकाशी अवलंबून नसते तर कधी कधी परिस्थितीही तडजोड करायला लावणारी असते. सासू-सासऱ्यांबरोबर राहणाऱ्या एका तरुणीला तडजोड म्हणजे आपल्या स्वातंत्र्यावर आलेली गदा वाटते. “लग्नानंतरही स्वातंत्र्य मिळतं पण त्याला मर्यादा असतात. एखादे दिवशी घरात काम करायचा कंटाळा आला किंवा बाहेर जाऊन खावं वाटलं तर ते स्वातंत्र्य सहज मिळत नाही. बाहेर सिनेमा किंवा फिरायला जातानाही सगळा स्वयंपाक करून जावा लागतो, पण याची तयारी कुठेतरी आधी करून ठेवावी लागते.
शेवटी संसार म्हणजे तडजोडच आहे.’ या तडजोडी माणसांचे स्वभाव किंवा वेळा सांभाळताना कराव्या लागल्या तर त्याची खोलात जाऊन चर्चा होत नाही पण आजच्या पुरुषाइतकीच अर्थार्जनाची क्षमता असलेल्या स्त्रीला केवळ स्त्री म्हणून तिच्या करिअरशी तडजोड करावी लागली तर ती बोच मनाला लागते. बॅंकेत नोकरी करणाऱ्या एकीला बाकी सगळी तडजोड मान्य आहे,
पण पुढच्या परीक्षा देऊन वरची पोस्ट मिळाली तर बदली होईल म्हणून क्षमता असतानाही कायम कारकुनी काम करत बसण्याची तडजोड पटत नाही. तिने परीक्षा देण्याला घरच्यांचा विरोध आहे. हा आपल्यावर, आपल्या बौद्धिक क्षमतेवर अन्याय आहे असं तिला वाटतं पण संसार टिकवायचा तर अशा तडजोडी कराव्याच लागणार! अर्थात सगळ्याच गोष्टी मनासारख्या मिळत नाहीत याची जाणीव ठेवून नवी पिढी वावरतेय ही देखील एक सकारात्मक सुरुवात म्हणायला हवी नाही का?