डॉ. मेघश्री दळवी
हवामान बदलाची झळ आपल्याला अनेक प्रकारे पोहोचते आहे. एकीकडे अतिवृष्टी आणि त्याच अतिवृष्टीने पिकं वाहून गेल्याने अन्नधान्याचा प्रश्न, तर दुसरीकडे तापमान पन्नास अंश सेल्शिअसला भिडत असताना काही प्रदेशात कडाक्याच्या थंडीने होणारे मृत्यू. त्यात आता पाणीटंचाईची शक्यता पुढे आलेली आहे.
जागतिक हवामानशास्त्रीय संस्था (वर्ल्ड मीटिओरॉलॉजिकल ऑर्गनायझेशन) गेली दोन वर्षे हवामानविषयक अहवाल प्रसिद्ध करत आहे. शेती आणि अन्न सुरक्षा यावर 2019 चा अहवाल होता. मागच्या वर्षीच्या अहवालात धोक्याची पूर्वसूचना कशी मिळवता येईल यावर भर होता आणि या वर्षी ऑक्टोबरमध्ये अहवाल प्रसिद्ध झाला आहे- पाणी या विषयावर.
या अहवालातला सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष म्हणजे 2050 पर्यंत जगातल्या पाच अब्ज लोकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करायला लागणार आहे. त्यावेळेस जागतिक लोकसंख्या पावणेदहा अब्ज असेल, असा युनायटेड नेशन्सचा अंदाज आहे. म्हणजे जगातील निम्मी जनता पाण्यासाठी हवालदिल झालेली असेल. तोवर जागतिक तापमानवाढ दोन अंश सेल्शिअसच्या जवळ पोहोचलेली असेल तर प्रश्न आणखी बिकट होऊ शकेल.
या संकटाला तोंड देण्यासाठी युनायटेड नेशन्सने बऱ्याच आधीपासून पाण्याचं योग्य नियोजन करण्याचं आवाहन केलेलं आहे, पण अपेक्षित लक्ष्य गाठण्यामध्ये 107 देश खूपच मागे पडलेले आहेत. त्यातले बहुतांशी देश विकसनशील आहेत आणि लोकसंख्यावाढीसारख्या अनेक समस्यांनी ग्रासलेले आहेत. पाणी नियोजनाचा वेग चौपट झाल्याशिवाय आपण या संकटाला तोंड देण्याला असमर्थ ठरू अशी भीती युनायटेड नेशन्सने व्यक्त केली आहे.
दरम्यान, गेल्या वीस वर्षांत पुरामुळे नुकसान होण्याचं प्रमाण त्याआधीच्या वीस वर्षांच्या तुलनेत 134 टक्क्यांनी वाढलं आहे. यात आशियाई देशांमध्ये पुरासारख्या नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना देणाऱ्या यंत्रणा कमजोर असल्याने जास्त नुकसान होताना दिसलं आहे. तर त्याच कालावधीत दुष्काळाचं प्रमाण 29 टक्क्यांनी वाढलं असून आफ्रिकी देशांचं नुकसान सर्वाधिक झालेलं आहे.
तिथेही पूर्वसूचना आणि पूर्वतयारी अपुरी पडते असं निरीक्षण आहे. विकसनाच्या सर्वात खालच्या पातळीवर असलेल्या देशांमध्ये सुमारे 70 टक्के मृत्यू हे पाणी आणि हवामानाशी संबंधित कारणाने होतात ही आकडेवारी खरोखरच व्यथित करणारी आहे.
या अहवालात पाण्याचं प्रदूषणावर भर नसला तरी ते कारण नजरेआड करता येत नाही. पृथ्वीवर पाणी भरपूर असलं तरी त्यातलं एक टक्क्याहूनही कमी पाणी पिण्यायोग्य परिस्थितीत उपलब्ध आहे आणि तेही सर्वांना मिळू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यात पाणी साठवण्याची अपुरी व्यवस्था, रासायनिक प्रदूषण,
सांडपाण्याची पुरेशी व्यवस्था नसल्याने ते पिण्याच्या पाण्यात मिसळणे असे अनेक घटक माणसाच्या जीवावर बेततात. त्यामुळे लवकर हालचाल केली नाही, तर जागतिक पाणीटंचाईची ही टांगती तलवार आणखी उग्र स्वरूप धारण करू शकते.