नवी दिल्ली: नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात एनडीएच्या खासदारांची बैठक पार पडली. महाराष्ट्रातील युती उद्धव ठाकरेंनी तोडली, भाजपनं नव्हे असा घणाघात पंतप्रधान मोदी या बैठकीत केला. एनडीएमधून बाहेर पडलेल्या पक्षांचा देखील त्यांनी यावेळी दाखला दिला. यापुढे देखील आपल्याला एनडीए म्हणून काम करायचं आहे, काँग्रेसप्रमाणे भाजप अहंकारी नाही, त्यामुळे भाजप सत्तेवरून पायउतार होणार नाही, असा विश्वास यावेळी त्यांनी खासदारांसमोर व्यक्त केला.
दिल्लीत पार पडलेल्या या बैठकीला पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते. अजित पवार गटाचे खासदारही बैठकीसाठी हजर होते. या बैठकीसाठी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अर्जुन मेघवाल आणि जे पी नड्डा उपस्थित होते. काँग्रेसच्या स्वार्थामुळे प्रणव मुखर्जी, शरद पवार यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांना पंतप्रधान पदाची संधी मिळाली नाही. वैयक्तिक स्वार्थासाठी अनेक नेत्यांचे खच्चीकरण केलं, असे म्हणत एनडीए बैठकीत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसच्या अहंकारी उदाहरणांचा दाखला दिला.
पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, ‘शिवसेना भाजपसोबत सत्तेत होती त्यावेळी सामना वृत्तपत्रात माझ्यवर टीका केली जायची. कारण नसताना वाद निर्माण होत असे. आम्ही अनेक वेळा सहन केले. तुम्हाला सत्तेत पण राहायचे आहे आणि तुम्हाला आमच्यावर टीका पण करायची आहे या दोन गोष्टी एकत्र कशा चालतील? बिहारमध्ये कमी संख्या असतानाही नितीशकुमार यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आले. एकनाथ शिंदे आले आणि त्यांना मुख्यमंत्रीपद दिले. आमचे मित्र आमच्यासाठी महत्वाचे आहेत.आपण एकत्र राहू, सर्वांचा आदर केला जाईल. भाजप काँग्रेससारखा अहंकारी नाही, त्यामुळे भाजप सत्तेतून जाणार नाही.असे त्यांनी यावेळी म्हटले.
महाराष्ट्राच्या विकासासाठी तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. यावेळी पीएम मोदींनी राजस्थानच्या खासदारांना संबोधित करताना सांगितले की, राजस्थानमधील कोणत्याही सरकारची स्थिती आता इतकी वाईट नाही. भारताच्या विकासासाठी राजस्थानची निवडणूक जिंकणे आवश्यक आहे. राजस्थानची निवडणूक जिंकणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे.सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. मी वैयक्तिकरित्या घराणेशाहीच्या राजकारणाच्या विरोधात असल्याचे पंतप्रधान म्हणाले.