पुणे – राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राज्यात सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेताच; राष्ट्रवादी कॉंग्रेसचा मोठा गट अजित पवारांच्या सोबत बाहेर पडला आहे. तर, जे शरद पवार गटात राहणार आहेत. त्यातील अनेकांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र, या दोन्ही गटातील वाद संपून पुढील काही महिन्यात हे दोन्ही गट एकत्र येतील, या आशेवर पुण्यातील अनेक आजी-माजी नगरसेवकांनी आपली भूमिका अद्यापही स्पष्ट केलेली नाही. मात्र, आता या नेते आणि कार्यकर्त्यांना आपली भूमिका घ्यावी लागणार आहे.
राष्ट्रवादी नेमकी कोणाची याचा वाद निवडणूक आयोगासमोर गेल्याने शरद पवार गटाकडून कार्यकर्त्यांचे संघटन निश्चित करण्यासाठी “मी शरद मित्र’ या नावाने सह्यांची मोहीम सुरू केली आहे. त्याची सुरुवात आजपासून कोथरूड विधानसभा मतदारासंघातून करण्यात येणार आहे. त्यामुळे, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आता आपला गट निश्चित करावा लागणार असून पक्षाचे कार्यकर्ते चांगलेच कात्रीत सापडले आहेत.पुणे शहरात शरद पवारांच्यासोबत आपण आहोत हे सांगण्यासाठी कोथरूड विधानसभा मतदारसंघात ‘मी शरद मित्र’ या नावाखाली सदस्य नोंदणी अभियान सुरू करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष स्वप्निल दुधाने यांनी या अभियानाची सुरुवात केली आहे. खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते अंकुश काकडे यांच्यासह पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
काठावरच्या सदस्यांची कोंडी?
दरम्यान, पक्षात उभी फूट पडल्यानंतर लोकसभा निवडणुकीपूर्वी दोन्ही गट एकत्र येऊन हा वाद संपेल, अशी अनेकांना आशा आहे. त्यामुळे, आपण कोणासोबत हे अनेकांनी स्पष्ट केलेले नाही. त्यातच, अजित पवार आणि शरद पवारांच्या सातत्याने भेटी होत असल्याने या कार्यकर्त्यांची आशा पल्लवीत होत असतानाच; स्वत: खुद्द शरद पवार यांनीही या भेटींचा थेट संदर्भ देत आपण भाजपसोबत जाणार नाहीत, असे स्पष्ट केले आहे. तसेच राष्ट्रवादी आमचीच असल्याचे पत्रही या गटाने आयोगास दिले आहे. मात्र, त्यासाठी दोन्ही गटांना कार्यकर्ते तसेच पक्ष संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची पत्रे आयोगास द्यावी लागणार आहेत.
त्यामुळे पवार गटाकडून पुण्यात पाठींब्यासाठी सह्याचे अभियान सुरू केल्या कोणत्या गटात जावे यासाठी काठावर असलेल्या नेत्यांची चांगलीच कोंडी झाली आहे. त्यात, प्रामुख्याने अनेक माजी नगरसेवक तसेच महापालिका लढविण्यासाठी इच्छूक असलेल्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. महापालिकेत भाजपची सत्ता होती. त्यांचे सुमारे 100 माजी नगरसेवक आहेत. तर राष्ट्रवादीचे 42 तर शिवसेनाही सोबत असल्याने जागा वाटपात निश्चितच भाजपच्या वाट्याला अधिक जागा जाणार आहेत.
त्या तुलनेत अजित पवार गटाची कोंडी होणार आहे. त्याच वेळी, पवार गटात मात्र, शिवसेना आणि कॉंगेस सोबत असली तरी त्यांचे सध्याचे संख्याबळ राष्ट्रवादीच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे तिघांनी समान जागा घेतल्या तरी पवार गटाला जास्त जागा असणार आहेत. त्यामुळे, काय भूमिका घ्यावी याबाबत अनेक जण संभ्रमात असून त्यांना आता याबाबत तातडीनं निर्णय घ्यावा लागणार आहे.