Lok Sabha Election 2024 – आम्हाला देशभर जनतेचा पाठिंबा मिळत आहे. यावेळी सत्यापुढे असत्य टिकणार नाही आणि आम्ही ताकदीने निवडणूक लढवत असून आम्हाला जनतेचे भरभरून प्रेम मिळत आहे. त्यामुळेच सध्या सुरु असलेल्या लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला ३०० हून अधिक जागा मिळतील, असा दावा बिहारचे राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी केला आहे.
लोकसभा निवडणुक २०२४ साठी सर्वच पक्षांचा जोरदार प्रचार सुरू आहे. आरोग्याच्या समस्या असतानाही तेजस्वी यादव जोरदार प्रचारात व्यस्त आहेत. तेजस्वी यादव यांनी पुन्हा एकदा केंद्रातील भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. पाटण्यात निवडणूक रॅलीला संबोधित केल्यानंतर तेजस्वी यादव बोलत होते.
तेजस्वी यादव म्हणाले की, देशभरातील तरुणांमध्ये हा सर्वात मोठा मुद्दा उपस्थित केला जात आहे. ती म्हणजे अग्निवीर योजना. आम्ही याबाबत लष्कराच्या अधिकाऱ्यांशी बोललो आहोत. सरकारला पोलिसांमध्येही अग्निवीर योजना लागू करायची आहे. केंद्र सरकारने आधी जुनी पेन्शन योजना रद्द केली. आता युवकांच्या भविष्याशी खेळ सुरु आहे.
सम्राट चौधरी म्हणाले होते की, ४ जूनच्या निकालानंतर सर्व भ्रष्टाचारी तुरुंगात जातील. यावर विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव म्हणाले, कोणीही त्यांच्याकडे (भाजपाकडे) आकर्षित होत नाही. त्याच्या सभेला चार लोकही येत नाहीत. केजरीवाल योग्य बोलत आहेत आणि चांगले काम करत आहेत.