रेडा – साहेब तुम्ही दिल्लीला फोन केला, आणि रासायनिक खतांच्या किमती कमी झाल्या. तसाच एक आमच्या इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी जलसंपदामंत्री जयंतराव पाटील यांना एक फोन करा आणि आम्हाला हक्काचे पाच टीएमसी पाणी मिळवून द्या.अशी आर्त हाक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. शशिकांत तरंगे यांनी दिली आहे.
डॉ. तरंगे म्हणाले की, शरद पवार यांनी एक दिल्लीला फोन केला तर खतांच्या किमती कमी केल्या. केंद्रात भाजपचे सरकार आहे. परंतु राज्यात आपल्या विचारांचे सरकार आहे. त्यामुळे फक्त तुमच्या एका कॉलची इंदापूर तालुक्याला नितांत गरज आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात इंदापूर तालुका कायम आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे. आगामी काळात देखील त्याच पद्धतीने उभा राहणार आहे.अशी ग्वाही तरंगे यांनी दिली.
शासकीय स्तरावरूनच इंदापूर तालुक्याला पुण्यातून येणारे पाच टीएमसी सांडपाणी शेतीसाठी देण्याचा निर्णय झाला होता. साठ गावांतील शेतकरी आपण हा जो निर्णय दिला होता. या निर्णयामुळे करोनाची साथ असताना देखील पाणी मिळणार, या आशेच्या किरणाने शेतकरी खुश होता.
मात्र, आपल्याच पक्षाचे जलसंपदामंत्री अचानकच सोलापूर जिल्ह्याच्या दबावाला बळी पडून चुकीच्या गोष्टी ऐकून इंदापूर तालुक्याला मिळणारे पाच टीएमसी पाणी योजना स्थगित केली आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या आयुष्यावर विरजण पडले आहे.