आ. शशिकांत शिंदे आक्रमक; पक्षपातीपणाच्या भांडाफोडीची होणार गर्जना
सातारा – राज्यातील सत्ता बदलानंतर प्रशासन मंत्री आणि सत्तेतील आमदारांच्या इशाऱ्यावर नाचत असून जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी कटपुतलीसारखे वागत आहेत. विकासनिधीपासून ते विरोधकांचा आवाज दाबण्याचे काम सत्तेच्या माध्यमातून सुरु आहे. सातारा जिल्ह्यात असे प्रकार यापूर्वी कधीही होत नव्हते. जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना विविध प्रश्नांवर जाब विचारत त्यांच्या पक्षपातीपणाचा भांडाफोड करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने गुरुवारी (दि.23) सातारा येथे निषेध लाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आ. शशिकांत शिंदे यांनी सातारा येथे पत्रकार परिषदेत दिली.
आ. शिंदे म्हणाले, राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर सत्तेवर आलेल्यांनी उन्माद सुरु केला आहे. आपले आमदार वाचवण्यासाठी सरकारी तिजोरी मोकळी करण्याचा सपाटा लावला आहे. सरकारमधील मंत्री, आमदार यांच्याकडून विकासनिधी पळवून विरोधकांचा आवाज दाबण्याचे काम होत आहे. सातारा जिल्ह्याला एक वेगळी परंपरा आहे. विरोधासाठी विरोध याठिकाणी कधी होत नव्हता.
राजकारण एका पातळीपर्यंत होत होते. आता मात्र राजकारणाची पातळी खालावली आहे. विरोधकांना निधीच द्यायचा नाही, विरोधकांचा आवाज दाबायचा असले उद्योग सुरु आहेत. सत्ता मिळवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणाचा वापर करुन नडेल त्याला त्रास देण्याचे उद्योग सुरु आहेत. आम्ही पण सत्तेत होतो मात्र सत्तेचा उन्माद आम्ही कधी केला नाही. प्रशासकीय अधिकाऱ्यांवर दबाव आणून विरोधकांना संपवण्याचे काम सध्या जिल्ह्यात सुरु आहे. जिल्हा प्रशासनाच्या चाललेल्या चुकीच्या कारभाराबाबत अनेकदा तक्रारी केल्या मात्र प्रशासकीय कारभारात सुधारणा झाली नाही. प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी पक्षपातीपणा करत असून त्याविरोधात आवाज उठवण्यासाठी गुरुवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने निषेध लाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी 10 वाजता बॉम्बे रेस्टॉरंट ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पक्षपातीपणाची पुराव्यांसह भांडाफोड करणार असल्याचा इशारा आ. शिंदे यांनी दिला. आमदार शिंदे म्हणाले, सातारा जिल्ह्यात राजकारण विरहित वातावरण होते, मात्र, सत्ता बदलानंतर सहा-सात महिन्यात विरोधकांचा आवाज दाबला जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांसह इतर सर्व अधिकारी एखाद्या पक्षाचा कार्यकर्ता असल्यासारखे वागत आहेत. ते कोणाच्या दबावाखाली काम करतात हे पुराव्यासह उघडकीस आणणार आहे.
त्यासाठी गुरुवारी बॉम्बे रेस्टॉरंट चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात येणार आहे. सातारा जिल्ह्याला वेगळी परंपरा असून या जिल्ह्यात राजकारण एका सीमेपर्यंत होत असते मात्र सत्ताधारी जिल्ह्याची परंपरा मोडीत काढून प्रशासनावर हुकूमशाही राबवत आहेत. जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी हे सत्ताधाऱ्यांची कटपुतली असल्यासारखे वागत असून या अधिकाऱ्यांचा भांडाफोड निषेध लाठी मोर्चात करणार असल्याचा इशारा आ. शिंदे यांनी यावेळी दिला. राष्ट्रवादी भवनात झालेल्या या पत्रकार परिषदेस समिंद्रा जाधव, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, रमेश उबाळे, गोरखनाथ नलवडे, तेजस शिंदे, अतुल शिंदे यांच्यासह युवकचे पदाधिकारी उपस्थित होते.
कोरेगावमधील वाईट प्रवृत्ती हटवण्यासाठी लढणार
मेडिकल कॉलेजच्या भंगार चोरीबाबत एक महिन्यात कारवाईचे आश्वासन देऊनही अद्याप कोणी गुन्हा दाखल करायचा यातच सर्व अडकून पडले आहे. भंगार चोरणाऱ्यांशी या अधिकाऱ्यांशी साटेलोटे आहे. शासकीय अधिकारी कोणाच्या दबावाखाली काम करतात, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हे आंदोलन आहे. शेतकऱ्यांच्या कर्ज माफीचा दुसरा हप्ता मिळालेला नाही. शेतकऱ्यांची वीज तोडणे केली जात आहे. विजवितरणकडे डीपींची कमतरता आहे. नोकरभरतीकडे दुर्लक्ष झालेले आहे. एस. टी. महामंडळाच्या सेवेबद्दल तक्रारी वाढल्या आहेत. या सर्व बाबींवर आवाज उठविला जाणार आहे. सुडबुद्धीने अधिकारी पूर्णपणे एकतर्फी वागत असून गुरुवारी निघणारा मोर्चा हा जिल्ह्याचा मोर्चा असेल. कोरेगाव-खटाव मतदारसंघात सत्तेचा वापर करुन त्रास देण्याचे उद्योग सुरु आहेत. मात्र आम्ही अशा धमक्यांना घाबरणारे नाही. कोरेगावमधून वाईट प्रवृत्ती हटविण्यासाठी आगामी काळात लढणार असल्याचे आ. शशिकांत शिंदे यांनी यावेळी सांगितले.