मुंबई: राष्ट्रवादीतून बंडखोरी करून भाजपच्या गोटात दाखल झालेल्या अजित पवारांचे बंड शमवण्याचे राष्ट्रवादीसमोर मोठे आव्हान असणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादीकडून सर्वोतपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. अजित पवारांची समजूत काढण्यासाठी राष्ट्वादीचे जेष्ठ नेते त्यांच्या भेटीला गेले होते. परंतु पुन्हा त्यांना खाली हातानेच परतावे लागल्याचे पाहायला मिळत आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि दिलीप वळसे पाटील यांनी अजित पवारांची भेट घेतली. मात्र त्यांची मनधरणी करण्यात दोन्ही नेते अपयशी ठरले. उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या अडचणी वाढल्या आहेत.
तसेच उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून राष्ट्रवादीकडून अजित पवार यांची मनधरणी कारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र अद्याप यामध्ये राष्ट्रवादीला यश आलेलं नाही. शरद पवारांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि अजित पवारांचे अनेक वर्षांचे विश्वासू सहकारी दिलीप वळसे पाटील यांना अजित पवारांची समजूत काढण्यासाठी पाठवलं होतं. मात्र दीड तासाच्या चर्चेनंतरही अजित पवारांची मनधरणी करण्यात पाटील यांना अपयश आलं आहे.
दरम्यान उपमुख्यमंत्री पदाची शपत घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी देखील अजित पवारांची भेट घेत मन वळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांनाही रिकाम्या हातानं परतावं लागलं होत. आमदार रोहित पवार यांनीदेखील फेसबुक पोस्टच्या माध्यमातून अजित पवार यांनी माघारी परतण्याचं आवाहन केलं आहे. लवकरच महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत येईल. पण यात हक्काची माणसं दुरावू नयेत, अशा शब्दांमध्ये रोहित पवार यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.