मुंबई – जहाजावरील कथित ड्रग पार्टीवरून ज्या लोकांना अटक करण्यात आली आणि नंतर त्यांना भाजप नेत्यांच्या सांगण्यावरून सोडून देण्यात आले त्या व्यक्तींना सोडून देण्यात आल्याच्या घटनेचे फुटेज एनसीबीने सादर करावे, असे आव्हान आज पुन्हा एकदा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी दिले आहे.
ते म्हणाले की, एनसीबीने अकरा जणांना अटक केली आणि तीन जणांना लगेच सोडून दिले, असा माझा आरोप आहे. आता एनसीबी म्हटते आहे की, आम्ही चौदा जणांना अटक केली आणि सहा जणांना सोडून दिले आहे. आता जे जादाचे तीन लोक सोडून दिले आहेत त्यांची नावे एनसीबीने जाहीर करावीत असे आव्हान मलिक यांनी दिले.
जहाजावर मादक द्रव्यांची जप्ती केली गेली आहे असा एनसीबीचा दावा एनसीबीने स्वत:च चुकून जाहीर केलेल्या व्हिडीओतून खोटा ठरला आहे असेही त्यांन म्हटले आहे. ही जप्ती कारवाई समीर वानखेडे यांच्या कार्यालयातील आहे आणि त्या व्हिडीओमध्ये जे पडदे दिसत आहेत तेही पडदे वानखेडे यांच्याच कार्यालयातील आहेत.
याचाच अर्थ जप्तीची कारवाई वानखेडेंच्या कार्यालयात केली गेली आहे. जप्तीची कारवाई हा एक बनाव आहे. जहाजाच्या ठिकाणी मादकद्रव्ये जप्त केली गेली याला कोणताही सबळ पुरावा नाही असेही मलिक यांनी म्हटले आहे.