श्रीनगर – लष्कर ए तोयबा, जैश एमहंमद, अल बदर आणि अशा स्वरुपाच्या दहशतवादी संघटनांसाठी काम करणाऱ्या 900 जणांना ताब्यात घेण्यात आले. जम्मू काश्मिर पोलिसांनी ही व्यापक कारवाई रविवारी केली.
काश्मिरमधील अल्पसंख्यांक समाजावर दहशतवादी संघटनांनी हल्ले केल्यानंतर ही मोहीम हाती घेण्यात आली. ही काश्मिर खोऱ्यात केलेली सर्वात मोठी कारवाई असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. सर्व ताब्यात घेतलेल्यांकडे तपास करणाऱ्या वेगवेगळ्या यंत्रणा चौकशी करत आहेत, अल्पसंख्यांकांची हत्या करण्याचे सध्याचे कार्यरत मॉडेल शोधण्याचा तपास यंत्रणांचा प्रयत्न असल्याचे या सूत्रांनी सांगितले.
अटक करण्यात आलेले सर्व जण दहशतवाद्यांना नैतिक पाठींबा देत असल्याचे स्पष्ट झाले आहे. दी रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) या दहशतवादी संघटनेचे सदस्य पाकिस्तानातील लष्कर ए तोयबा संघटनेला बळ पुरवत होते. मात्र, त्यांनी सध्या लक्ष्य निश्चित करून हत्या करायला सुरवात केली असल्याची गुप्तचरांची माहिती आहे.
काश्मिरी पंडित व्यावसायिक माखनलाल बिंद्रु (वय68) यांच्या हत्येची जबाबादारी टीआरएफने घेतली आहे. बिंन्द्रु यांची मेडीकेट या त्यांच्या औषधांच्या दुकानात जवळून गोळी मारून हत्या करण्यात आली होती. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तेथे ते मरण पावल्याचे जाहीर केले. काल सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही हत्या करण्यात आली होती, असे पोलिसांनी सांगितली.
बिंन्द्रु यांच्या हत्येनंतर रस्त्याकडेला भेळपुरी आणि गोलगप्पे विकणाऱ्या विरेंद्र पास्वान या मुळच्या बिहारी विक्रेत्याचीही दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली. त्याच पध्दतीने दहशतवाद्यांनी महंमद शफी लोन या टॅक्सी स्टॅंडच्या अध्यक्षाची गोळ्या घालून हत्या केली होती.
अतिरेक्यांनी 30 सप्टेंबर रोजी एका शाळेतील दोन शिक्षकांची हत्या केली होती. ते दोघेही अल्पसंख्यांक समाजाचे म्हणजे हिंदू आणि शिख नागरिक होते. सप्टेंबरच्या अखेरीस सात नागरिकांची हत्या करण्यात आली. त्यातील तीन जण अल्पसंख्यांक समाजाचे होते. “आम्ही ही हिंसाचाराची बदलती पध्दत पाहिली आहे.
मुस्लीमेतर आणि अल्पसंख्यांकाना स्वीकारले जाणार नाही हा संदेश त्यांना द्यायचा आहे. नवा नागरिकत्व कायदा आणि निवडणुक प्रक्रियेवर अतिरेक्यांचा मुख्य आक्षेप आहे’, असे सूत्रांनी सांगितले.