रायपुर – किमान सात सुरक्षा जवानांची हत्या करणाऱ्या एका कट्टर नक्षलवाद्याला अटक करण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे.त्याला छत्तीगडच्या नारायणपुर जिल्ह्यात अटक करण्यात आली आहे. हा केवळ 20 वर्षीय इसम असून त्याचे नाव पंद्रु पदामी असे आहे.
नक्षलवाद्यांच्या अमदई घाटी कमिटीचा सेक्रेटरी सुरेश सलाम याचा तो निकटवर्तीय मानला जातो.गेल्या वर्षी 20 ऑगस्टला कडेमेटा गावात आयटीबीपीचे सहायक कमांडट सुधाकर शिंदे आणि सहायक उपनिरीक्षक गुरूमुख सिंह यांची हत्या करण्यात आली होती. हा घातपात पदामीनेच घडवला होता.
गेल्या वर्षी सुरूंगाचा स्फोट घडवून अन्य पाच जवानांची हत्या करण्यात आली होती. तोही प्रकार त्यानेच घडवला होता. पदामी हा आज तोयामेटा गावात नक्षलवाद्यांच्या एका बैठकीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना त्यांच्या खबऱ्यांमार्फत मिळाल्यानंतर जिल्हा रिझर्व्ह गार्डचे एक सशस्त्र पथक तिकडे पाठवण्यात आले. त्या पथकाने आपली कामगीरी फत्ते करून पदामीच्या मुसक्या आवळल्या.