भुवनेश्वर :- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, 2015-2019 या वर्षांमध्ये नक्षलवादाच्या घटना 30 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. तसेच नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमधील चकमकीही 32 टक्क्यांनी घटल्या आहेत. अमित शहा शनिवारी ओडिशा दौऱ्यावर होते आणि यादरम्यान त्यांनी अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायकही उपस्थित होते.
राजधानी भुवनेश्वरमधील एका कार्यक्रमादरम्यान अमित शाह म्हणाले की, 2015-2019 या वर्षांमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांच्या मृत्यूच्या घटनांमध्ये 56 टक्के घट झाली आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांनी ओडिशा सरकार आणि मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या सहकार्याबद्दल आभार मानले.
कार्यक्रमादरम्यान, गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी कालाहंडी जिल्ह्यातील लाडूगाव ते बाणेर या रस्त्याच्या रुंदीकरण आणि मजबुतीकरणाच्या प्रकल्पाची पायाभरणी केली. यावेळी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधानही उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री नवीन पटनायक म्हणाले की, ‘यावर्षी राज्यात 6500 किमी लांबीचे रस्ते आणि 300 पूल बांधण्याची आमची योजना आहे. अलीकडच्या काळात दोन विमानतळ पूर्ण झाले आहेत. ओडिशाचा नेहमीच सहकारी संघराज्यावर विश्वास आहे. राज्याच्या विकासासाठी भारत सरकारच्या सहकार्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.