संदीप खरे
मैत्री! मैत्रीची व्याख्या करणं तसं कठीण आहे. कारण, मैत्री ही खूप व्यापक संकल्पना आहे. मैत्री व्यक्तीशी, चांगल्या चित्रांशी, पुस्तकांशी अगदी निसर्गातील कुठल्याही गोष्टीशी होऊ शकते. मैत्रीला स्थळ, काळ, वेळ, सीमा असं कुठलंचं बंधन नसतं. मैत्रीसाठी आवश्यक आहे तो मनाचा निखळपणा, निःस्वार्थीपणा! एक चांगला मित्र जपणं म्हणजे आपल्यातीलच चांगुलपणा जपल्यासारखं असतं. आजच्या “फ्रेंडशिप डे’च्या निमित्ताने संदीप खरे यांनी व्यक्त केलेले मनोगत.
“एकमेकांविषयी उत्सुकता असणाऱ्या दोघांमध्ये एकानं अपेक्षा पूर्ण केली नाही म्हणून जे नातं संपत नाही तीच मैत्री!’ वास्तविक पाहता, मैत्रीची व्याख्या करणं तसं काहीसं अवघडंच आहे. कारण, मैत्री ही खूप व्यापक संकल्पना आहे. मैत्री फक्त कॉलेजमधील युवक-युवतींमध्येच किंवा दोन पुरुषांमध्ये किंवा दोन स्त्रियांमध्येच असते असं नाही. तसंच ती एका शहरातील दोन व्यक्तींमध्येच असेल, असंही नाही. मैत्रीची व्याप्ती जगभर पसरलेली आहे. अलीकडे तर इंटरनेटसारखे माध्यम असल्यामुळे मैत्री ही जगाच्या कानाकोपऱ्यातील कोणत्याही व्यक्तींमध्ये होऊ शकते. मैत्री फक्त दोन व्यक्तींमध्येच होऊ शकते असं नाही, तर ती चांगल्या चित्रांशी, पुस्तकांशी, निसर्गातील कुठल्याही गोष्टीशी होऊ शकते. थोडक्यात, मैत्रीला स्थळ, काळ, वेळ, सीमा अशा कुठल्याचं गोष्टींचं बंधन नसतं. असं असलं तरी सर्वात महत्त्वाची म्हणजे स्वतःशी असलेली मैत्री! या मैत्रीसारखं सुख नसतं. ही गोष्ट थोडी अवघड आहे; पण अशक्य मात्र नक्कीच नाही! एकदा स्वतःशी मैत्री झाली की आपोआपच अवलंबून राहणं खूप कमी होतं.
मैत्री या नात्याला अनेक पैलू आहेत. कुठलंही बंधन नाही त्यालाच आपण मैत्री म्हणतो. ज्या गोष्टी मैत्रीमध्ये कराव्यात त्या गोष्टी कधीही ठरवून करता येत नाहीत. मैत्री असेल तर त्या आपोआपच होतात. उदाहरणार्थ, एखादं चांगलं पुस्तक गाजलं की ते अभ्यासक्रमात येतं आणि मग त्याचं टेक्स्ट बुक होतं; पण चांगलं पुस्तक हे चांगलंच राहतं. मैत्रीचंही तसंच आहे. नियम हे नियम म्हणून पाळले तर ते तसेच राहतात. पण त्यापेक्षा ते उत्स्फूर्तपणे आपल्या वागण्यात उतरले पाहिजेत. बरेचदा, मैत्रीला नात्याचं कुंपण जडलं की ती टिकत नाही, असं म्हटलं जातं; पण माझ्या मते नात्याच्या बंधनातही ती टिकली पाहिजे. ती तशी टिकत नसेल तर ती मैत्रीच नाही. नातं जोडताना वा मैत्री करताना आपण तशीच निरपेक्ष भावना ठेवणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे मग या मैत्रीच्या नात्याचं पुढं नवरा-बायकोच्या नात्यात रूपांतर झालं तरी फार फरक पडत नाही. दोघांमधील मैत्र तसंच जपून ठेवलं तर ते नातं चिरकाळ ताजंतवानं राहातं आणि नात्यातही मैत्री होतेच की हो! आजोबा आणि नातवाची, आजी आणि नातीची, अगदी वडील आणि मुलाचीही मैत्री असतेच की!
मैत्री चिरकाळ टिकण्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे स्वतःमधील निखळपणा आणि निःस्वार्थीपणा! सामान्य माणसाप्रमाणे मैत्रीकडे पाहिलं तर ती चिरकाळ टिकत नाही. राग, लोभ, द्वेष, मत्सर, चिडणं, भांडणं या साऱ्या गोष्टी मैत्रीमध्ये असाव्यात; पण त्यामध्ये निखळता असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर या सर्व गोष्टी मोकळेपणाने वेगळ्या ठेवता येण्याचं कौशल्यही आपल्यामध्ये असायला हवं आणि निखळता असल्याशिवाय हे शक्य होत नाही.
बरेचदा, आपल्याबरोबर असणाऱ्या, सोबत वावरणाऱ्या सगळ्या ओळखीच्यांना आपण मित्र म्हणत असतो. त्यांच्यातला खरा मित्र कोण हे कळायला खूप वेळ लागतो; पण जेव्हा अशा खऱ्या मित्राची ओळख पटते तेव्हा तो मित्र सदैव आपल्याजवळ राहील याची नक्की काळजी घ्यायला पाहिजे. “एक चांगला मित्र जपणं म्हणजे आपल्यातीलच चांगुलपणा जपल्यासारखं असतं.’ तुम्ही जर मनाने खरोखरच निर्मळ असाल तर ही मैत्री नक्कीच चिरकाळ टिकते. एखाद्या प्रतिभावंताची कला किंवा कविता जगासमोर येण्यासाठी किंवा प्रसिद्ध होण्यासाठी नक्कीच मैत्रीची साथ लाभते; पण तसं पाहिलं तर कुठलीही कला ही मैत्रीच्या पलीकडची गोष्ट आहे. कारण, ती दैवी देणगी, नशीब आणि स्वतःमधील उत्स्फूर्तता यातून प्रकट होत असते; मात्र, एखादी कला जेव्हा सामूहिक होते तेव्हा त्यात सर्वांचाच सहभाग असतो. या कलेला जेव्हा यश प्राप्त होते, ती गौरवली जाते, लोकांच्या कौतुकाचा विषय ठरते तेव्हा त्यामध्ये नक्कीच मैत्रीचा सहभाग असतो. “आयुष्यावर बोलू काही’ या कार्यक्रमाच्या यशामागेही सलील आणि आमची पूर्ण टीम यांचा सहभाग आहे. हे सारं यश या मैतरांचंच आहे.
मैत्री केवळ त्या दिवसापुरतीच असते, असं नाही. उलट अशा विशिष्ट दिवशी आठवण ठेवून मित्राला-मैत्रिणीला खास शुभेच्छा दिल्या तर त्यामुळे हे बंध अधिक दृढच होतील. मदर्स डे असो, फादर्स डे असो; अशा दिवशी आपल्या जीवलगांना आठवणीने शुभेच्छा दिल्या तर त्यात गैर असं काहीच नाही. अर्थातच, हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे; पण या सुंदर नात्यांना एका विशिष्ट चौकटीत बसवून बंदिस्त करू नये, हे मात्र नक्की! आयुष्याच्या संध्याकाळी आपला जीवनपट उलगडून मागे वळून पाहताना त्या सीमारेषेवर एखादा जरी असा निखळ मैतर असेल तरी तुम्ही स्वतःला “श्रीमंत’ म्हणायला काहीच हरकत नाही!
(शब्दांकन ः आशिष जोशी)