अमरावती – रस्त्याच्या भूमिपूजनावरून नवनीत राणा आणि यशोमती ठाकूर यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. अमरावती जिल्ह्यातील वाठोडा शुकलेश्वर ते म्हैसपूर रस्त्याचे भूमिपूजन नवनीत राणा आणि यशोमती ठाकूर या दोन्ही नेत्यांकडून करण्यात आले.
दोन दिवसांआधी आमदार यशोमती ठाकूर यांनी केलेल्या रस्त्याचे भूमिपूजन पुन्हा नवनीत राणा यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावरून दोन्ही नेत्यांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे.
यावेळी बोलतांना नवनीत राणांनी यशोमती ठाकूरांवर टीका केली आहे. त्या म्हणाल्या, ज्याचे लेकरू त्यानेच बारसं करायला हवे, उगाच शेजारच्यांनी येऊन बारसे करू नये. त्यावर प्रत्युत्तर देत आमदार यशोमती ठाकूर म्हणाल्या की, लोकसभा निवडणुका जवळ आल्याने हिरोइन मटकून राहिली आहे.
अर्थसंकल्प २०२२-२३ अंतर्गत या रस्त्याचे काम करत असल्याचा आशय खासदार नवनीत राणा यांच्या भूमिपूजनेच्या फलकावर आहे. तसेच २०२३-२४ अर्थसंकल्पांतर्गत या रस्त्याचे काम करण्यात येत असल्याचा उल्लेख यशोमती ठाकूर यांच्या भूमिपूजनाच्या फलकावर नमूद करण्यात आले आहे.