सातारा – सातारा जिल्ह्याच्या राजकारणात राष्ट्रवादीचा लढवय्या नेता म्हणून ओळख असणारे कोरेगावचे माजी आमदार शशिकांत शिंदे यांच्या पुनर्वसन प्रक्रियेला सुरुवात झाली. मुंबई येथे झालेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात त्यांच्यावर राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. नवी मुंबई शहर प्रभारी ही आणखी एक जबाबदारी देण्यात आल्याने शिंदे यांचा तेथील मुक्काम वाढणार आहे.
गेल्या दोन दशकापासून शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू अशी ओळख असणारे माजी आमदार शशिकांत शिंदे यांचा कोरेगाव विधानसभा निवडणुकीत अनपेक्षितरित्या पराभव झाला. खुद्द शरद पवार यांना शिंदे यांचा पराभव जिव्हारी लागला. निवडणुकीनंतर राष्ट्रवादीच्या बैठकीत पवार यांनी ती सल बोलून दाखवत शिंदे यांच्या लढवय्या बाण्याचे कौतुक केले होते. मात्र या राजकीय पिछाडीचा अनुभव गाठीला ठेवत पुढे वाटचाल करणाऱ्या शशिकांत शिंदे यांच्यावर राष्ट्रवादी पक्षाने प्रदेश उपाध्यक्षपद व नवी मुंबई जिल्हा प्रभारी अशी दुहेरी जबाबदारी सोपवली आहे.
आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन पवारांच्या सूचनेनंतर शिंदे यांना नव्या कामगिरीवर पाठवण्यात आले आहे. मुळचे राष्ट्रवादीचे पण ऐनवेळी भाजपवासी झालेले गणेश नाईक यांचा नवी मुंबई हा बालेकिल्ला बेलापूर व ऐरोली या दोन मतदारसंघात मोठे प्रभावक्षेत्र असणारे मतदार संघ युतीच्या वाटपात भाजपकडे राहूनही नाईक यांचे तिकिट मंदा म्हात्रे यांच्या निमित्ताने कट झाले.
मात्र तरीही नाईक यांचे या मतदारसंघात असणारे राजकीय वर्चस्व वादातीत आहे. त्या वर्चस्वाला सुरूंग लावत राष्ट्रवादीचे नेटवर्क उभे करणे ही शशिकांत शिंदे यांच्यासमोरील मुख्य जबाबदारी आहे. माथाडी कामगार चळवळीचे नेते म्हणून शशिकांत शिंदे यांचाही नवी मुंबईत चांगलाच दबदबा आहे. त्यामुळे शिंदे मुंबई महापालिकेच्या आखाड्यात काय करिष्मा घडविणार याची राजकीय उत्सुकता असणार आहे.
सातारा आणि कोरेगावकडेही लक्ष
जावली व कोरेगाव या दोन तालुक्यात मोठे समर्थन असणाऱ्या शशिकांत शिंदे यांनी प्रभावक्षेत्रात पुन्हा फेरजुळणी सुरू केली आहे. शक्यतेनुसार आठवड्यातून दोन ते तीन दिवस जावली व कोरेगावात तळ देऊन राष्ट्रवादीच्या नव्या संच बांधणीचा संकल्प शिंदे यांनी सोडला आहे.
कोरेगाव मतदार संघाच्या खेड व ल्हासुर्णे गटात राजकीय आघाडी टिकवताना शिंदे यांची बरीच दमछाक झाली. विधानसभा निवडणुकीच्या एकूण 31 फेऱ्यांमध्ये शेवटच्या पंचवीस फेऱ्यांमध्ये महेश शिंदे यांनी बाराशे मतांनी आघाडी वाढवत शशिकांत शिंदे यांचा 6300 मतांनी पराभव केला.
या सर्व बाबी लक्षात घेऊन शशिकांत शिंदे यांनी नव्याने फेरबांधणीचा निर्णय घेतला आहे. साताऱ्यातही राष्ट्रवादीचा प्रभाव टिकवण्याची जबाबदारी शशिकांत शिंदे यांच्यावर आगामी काळात असणार आहे. भविष्यात शिंदे यांना विधान परिषदेवर संधी मिळणार का? याचीही शिंदे समर्थकांना उत्सुकता आहे.