काळ खरोखर सूड उगवतो का? श्रद्धा-अंधश्रद्धांच्या पलीकडे जाऊन उत्तर द्यायचं झालं तर ते होकारार्थी आहे. तसं नसतं तर टक्कल पडू लागलेल्या डोक्यांवर फेटे बांधून, दैव नव्हे तर दुर्दैव रेखाटलेल्या कपाळाला मुंडावळ्या बांधून, घोड्यावर बसून, ढोलताशांच्या गजरात असंख्य “नवरदेव’ रस्त्यावर का आले असते?
दिसताना सगळे नवरदेव एकत्रितपणे श्रीवंदनाला निघाल्यासारखे दिसत होते. जणू काही गावात सामुदायिक विवाहसोहळा असावा. पण मुळात ते नवरदेव नव्हतेच. “उपवर’ शब्दाने जिथं लाजेने मान खाली घातली असे वय उलटून गेलेले “इच्छुक’ होते ते… “उपवर परि उपायचि नाही,’ या उक्तीनुसार लग्नाची वयोमर्यादा संपलेले! आता आपल्या गळ्यात कुणी माळ घालेल, याची आशा मावळत चाललेले! मिरवणुकीसारख्या दिसणाऱ्या, वाजतगाजत चाललेल्या मोर्चाच्या माध्यमातून सरकारला “वधू’ मागायला निघालेले!
अनेकांकडे नोकरीचा प्रश्न होताच; पण काहीजणांकडे नोकरी असूनसुद्धा छोकरीचा प्रश्न निर्माण झाला होता. प्रत्येकाची स्वतःची स्वतंत्र कहाणी होती; पण ती ऐकणारं कुणीच नव्हतं. शेकडोंच्या संख्येनं नवरदेव सोलापूरच्या रस्त्यावर चालायला लागलेले (त्यातील काही घोडेस्वार) पाहून बऱ्याच जणांना हा “इव्हेन्ट’ कोणता, याचाच अंदाज लागेना. या विवाहेच्छुक मंडळींच्या हातात “कुणी मुलगी देता का?’ असे फलक दिसत असल्यामुळे लोक आणखी कोड्यात पडले. लग्नासाठी मुली मिळत नाहीत, ही तक्रार अनेक भागांमधून विशेषतः खेड्यांमधून ऐकू येते.
हल्लीच्या मुली शिकल्या-सवरलेल्या असल्यामुळे त्यांच्या अपेक्षा वाढल्यात, असं सगळीकडे बोललं जातं. ग्रामीण भागात विशेषतः शेतकरी कुटुंबात मुलगी द्यायला कोणी तयार होत नाही, मुली स्वतः शेतकरी नवरा नाकारतात, याही बाबी समोर आल्यात. विशिष्ट भूप्रदेशात मुलगी द्यायची नाही, असाही दंडक काही कुटुंबांचा असतो. या सगळ्या कारणांमुळे लग्नाचं वय उलटून गेलेल्यांना मोर्चात नवरदेवाचा “गेटअप’ करण्यात समाधान मानावं लागतंय. या नवरदेवांनी आपलं लग्न न ठरण्याची अनेक कारणं सांगितली. पण महत्त्वाचं कारण मोर्चेकऱ्यांनीच समोर आणलं.
मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमी होत असताना सरकारने गर्भलिंग निदानावर बंदी आणणारा कायदा केला. परंतु प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे या कायद्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे झाली नाही. परिणामी राज्यात मुलींची संख्या घटत गेली आणि आजमितीस 1000 मुलांमागे 889 मुली इतका मोठा फरक निर्माण झालाय, असं या मोर्चाचं आयोजन करणाऱ्या संघटनेच्या संस्थापकांनी सांगितलं.
नेमका हाच काळानं उगवलेला सूड आहे. मुलगी नको, मुलगाच हवा या मानसिकतेतून ज्यांनी गर्भातून मुली गायब केल्या आणि मुलगेच जन्माला घातले, तंत्रज्ञानाचा दुरुपयोग केला, त्यांनी या परिस्थितीची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. त्यांच्यामुळे अनेक विवाहेच्छुकांना मुली मिळेनाशा झाल्यात.
या वरात-मोर्चाच्या माध्यमातून दिला गेलेला एक इशारा अतिशय गंभीर आहे. सध्या 2022 वर्ष सुरू आहे. 2032 मध्ये किंवा 2052 मध्ये काय परिस्थिती असेल, असा सवाल या मंडळींनी उपस्थित केला. त्या वेळी मुलींना रस्त्यावरून फिरणंही शक्य राहणार नाही आणि कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती हाताबाहेर जाईल, ही आज “फॅण्टसी’ वाटत असली तरी उद्याचं वास्तव असू शकतं. काळाचा सूड म्हणण्याऐवजी इशारा म्हणू हवं तर… पण ओळखला पाहिजेच!